कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये अडकलेले रत्नागिरीतील बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत वारंवार अनेक आंदोलने केली, निवेदने देण्यात आली तरी, शासनाकडून कोणताही ठोस निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ९ हजार ७४७ असून त्यांची थकीत रक्कम १४१०.०६ कोटी आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ११ हजार ३२६ आहे. त्यांची थकीत रक्कम २२३.८६ कोटी आहे. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज कोकण हापूस आंबा उत्पादन आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसाचे धरणे आंदोलन केले.
कोकणातील बागायतदारांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत कोकण हापूस आंबा उत्पादन आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सावंत, डॉ. विवेक भिडे, उपाध्यक्ष प्रकाश साळवी, रविकिरण तोडणकर, अभिजित वैद्य, मंदार काझी, रामचंद्र देसाई, मंदार साळवी, आक्रम नाकवा, हेमंत पावर, बाळू रामगडे, सदाशिव पाचकुडे, राजेंद्र कदम आदी उपस्थित होते.
११ हजार ३२६ शेतकऱ्यांचे २२३.८६ कोटी थकीत कर्ज माफ करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले जात आहे. शासनानेच याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी भाषणे करत शासनावर ताशेरे ओढले. २०२१-२२च्या आंबा हंगामातसुद्धा नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, अनियमित थंडी हवेचा लहरीपणा यामुळे झाडांना भरपूर मोहोर आला. बदलत्या हवामनामुळे आलेल्या छोट्या कैरीवरही परिणाम झाला. १० ते १५ टक्के अशी अल्प कैरी धरली; पण विचित्र वातावरणामुळे ती गळून देखील गेल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.