राज्यात हळूहळू हाथपाय पसरवत असलेल्या लम्पी त्वचा आजाराने चिपळूण तालुक्यातील सहा जनावरांचा मृत्यू झाला आहे. कोसबी, फुरूस, अलोरे, आंबेत, वारेली व हडकणी गावातील प्रत्येकी एक पशुधन या आजारामुळे दगावले असल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे येथील पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून लम्पीसदृश जनावरांवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.
तसेच तालुक्यात ३० हजार ८०६ जनावरांना लम्पीची लसही देण्यात आली असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी बारपात्रे यांनी दिली. चिपळूण तालुक्यातील काही गावांमध्ये लम्पीसदृश आजाराची जनावरे आढळली होती. त्यांच्या वैद्यकीय तपासणीअंती व नमुन्यांच्या अहवालानुसार, काही जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आतापर्यंत आढळलेली लम्पीसदृश जनावरे व लम्पीच्या जनावरांना येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तत्काळ उपचारास सुरवात केली आहे.
पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या जनावरांना विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या आहेत. तसेच त्या जवळपासच्या गावांतील आणि परिसरामध्ये देखील सर्वेक्षण करण्यात आले आहे. तालुक्यात लम्पी आजाराची साथ पसरू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने विशेष काळजी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर लम्पी लसीकरणावर भर देण्यात आली. शासनाने पाठवलेल्या ३१ हजार ३०० लसींमधून ३० हजार ८०६ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे चिंतेची बाब नसली तरी काळजी घेणे अनिवार्य आहे.
तसेच पशुधन मृत पावल्याने शेतकरी वर्गाचे देखील आर्थिक नुकसान झाले आहे. यासाठी लम्पीमुळे दगावलेल्या जनावरांना शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यामध्ये गायीचा मृत्यू झाल्यास ३० हजार रु. तर बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार रु. शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.