जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू शकत नाही. २५ विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी अभ्यास करून माहिती घेऊन आणि तीन तास बसण्याच्या मानसिकतेने या. आज कोण आले नाही, कोण मधून उठून गेले, याची माझ्याकडे सर्व माहिती आहे. मला वाईट बोलायला लावू नका. जनतेशी सौजन्याने वागायला शिका. यापुढे प्रत्येक विधानसभानिहाय जनता दरबार होईल. जनता दरबाराचा १०० टक्के रिझल्ट मिळाला पाहिजे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. जिल्हा नियोजन समितीच्या नव्या सभागृहात आयोजित जनता दरबारानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. उदय सामंत म्हणाले, आजच्या जनता दरबारामध्ये जनतेचे प्रश्न जागेवर सोडवून न्याय दिल्याचे समाधान आहे.
अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य दिले, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. यापुढे दर महिन्याला जनता दरबार होईल. प्रत्येत विधानसभानिहाय जनता दरबार घेतला जाणार आहे आणि तीन महिन्याने जिल्ह्याचा जनता दरबार होईल. या दरबाराचा १०० टक्के रिझल्ट मिळाला पाहिजे. या महिन्यात आलेल्या व्यक्तीचे प्रश्न पुढच्या महिन्याच्या दरबारापर्यंत सुटलेच पाहिजेत. अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन या आणि लोकांशी चांगले बोला, उद्दाम वागू नका. आजच्या बैठकीला कोण अधिकारी गैरहजर होते ते कोण मधूनच उठून गेला, याची माहिती माझ्याकडे आहे. तुम्हाला येणे शक्य नसेल तर मला आधी तसे पत्र द्या. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी यापुढे जनतेच्या प्रश्नासाठी दरबाराला उपस्थित राहिले पाहिजे.
अधिकाऱ्यांना शिस्त लावण्याची गरज आहे. या दरबारात वैयक्तिक, मदतीचे, आरोग्याचे, सरकारकडे पाठवण्याचे काही प्रश्न होते. त्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली. काही प्रशासनाची माणसं आली होती. त्यांच्याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षक दखल घेतील. आम्ही समाधानी आहोत.
अर्जाच्या संख्येवरून चांगले काम दिसते – जनता दरबारप्रसंगी मंत्री उदय सामंत म्हणाले, प्रशासनाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. दरबारात कमी तक्रार अर्ज आले, याचा अर्थ प्रशासन चांगले काम करते हे यावरून दिसते.