उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त रत्नागिरी मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. आणि रत्नागिरीमध्ये अनेक पर्यटन स्थळे असल्याने विविध ठिकाणी पर्यटकांची रेलचेलही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वाहनांची वर्दळ एवढी निर्माण होते कि पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे देखील कठीण होऊन बसते. त्यामुळे हल्ली या रस्त्यावर अनेक अपघात घडताना दिसून येत आहेत. अनेक पादचाऱ्यांना आपले प्राण हि गमवावे लागले आहेत.
रत्नागिरी गणपतीपुळे मार्ग अरुंद असला तरी, पर्यटक वेगाने गाड्या हाकत असल्याने, पादचारी देखील अनेक वेळा गोंधळून जातात आणि अपघात घडतात. काल असाच एक अपघात घडला असून, मौजे धामणसे सांबरेवाडी येथे सुलोचना सांबरे वय ६५, रा. धामणसे सांबरेवाडी या महिलेला स्विफ्ट कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कारचालक तेथून पळून गेला आहे.
स्विफ्ट गाडी क्रमांक एमएच.१३-बी एन.५५३१ गाडीचा चालक गणपतीपुळे येथे चाफे अशी घेऊन जात असताना गाडी भरधाव वेगाने चालवत साबंरेवाडी गणपतीपुळे मार्गावर पायी चालत असलेल्या सुलोचना सांबरे या महिलेला समोरून धडक दिली. अचानक झालेल्या आघाताने आणि जबरी धडकेने सांबरे या गोंधळून गेल्या. या अपघातात सदर महिलेच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. काल सायंकाळी हा अपघात घडला. अपघातानंतर कारचालक अपघात स्थळावरून खबर न देता पळून गेला. पोलीस संशयिताचा शोध घेत असून, महिलेच्या मृत्यू प्रकरणी पुढील तपास सुरु ठेवण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शी कोणी असेल तर त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.