कोकणामध्ये मनसेला जबरदस्त दणका बसला आहे. खेड येथील मनसेचे पहिले नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना सहा वर्षासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. खेडेकर यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून सहा वर्षांसाठी त्यांना अपात्र ठरवण्याची कारवाई करण्यात आली आहे.
खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी राष्ट्रवादीचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यापासून आपल्याला धोका असल्याचा दावा केला होता. तसंच प्रशासनाकडं पोलीस संरक्षणासाठी देखील मागणी केली होती. त्यांची ही मागणी प्रशासनानं मान्य केली आहे. रामदास कदम आणि वैभव खेडेकर यांच्यामध्ये धुसपुसत असलेल्या वादाचा जोरदार फटका खेडेकर यांना बसला असल्याची गुप्त चर्चा सुरु आहे.यामुळं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली-खेड विधानसभा मतदारसंघातील राजकारणाने चांगलीच पातळी ओलांडली असल्याचे दिसून येत आहे.
वैभव खेडेकर हे मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस म्हणूनही कार्यरत आहेत. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही अपात्रतेची कारवाई केली आहे. बुधवारी अपात्र ठरवण्यात आल्याचे आदेश मिळाल्याने मनसे सैनिकात एक प्रकारे खळबळ माजली आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ चे कलम ५५ ब मधील तरतुदीनुसार या आदेशाच्या दिनांकापासून ६ वर्षाचा कालावधी समाप्त होईपर्यंत त्यांना नगरपरिषद सदस्य म्हणून निवडले जाण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.
खेडेकर हे नगराध्यक्षपदावर चार वर्षांहून अधिक कालावधी असल्याने, त्यांना शासकीय संबंधित नियम, शासनाचे स्थायी निर्देश याची पूर्ण जाण असणे अपेक्षित आहे. परंतु, या कालावधीमध्ये त्यांच्या वरील झालेले दोषारोप पाहिले असता, त्यांची सर्व नियम धाब्यावर बसवून काम करण्याची वृत्ती दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांनी खेडेकर यांच्या विरोधात तक्रार करून चौकशी करून अपात्र ठरवण्याची मागणी केली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.