दादा, काका, मामा, पवार, पाटील अशा प्रकारच्या फॅन्सी नंबरप्लेटला आता कायमचा चाप बसणार आहे. हाय सिक्युरिटी नंबरप्लेटने हे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील २ लाख ११ लाख ४३२ वाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसवाव्या लागणार आहेत. त्यासाठी मार्चऐवजी एप्रिल २०२५ ची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नवीन नंबर प्लेट बसविण्याविषयीचे पत्र २२ डिसेंबर २०२४ ला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त झाले आहे. केंद्रीय मोटारवाहन नियमानुसार वाहनांना एचएसआरपी बसवण्याची तरतूद आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहन चोरी करून त्यांच्या नंबरप्लेट बदलून पोलिस यंत्रणेला गुंगारा दिला जात होता. या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत गेली.
वाहनांना नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणाऱ्या गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली. याला प्रतिबंध घालण्यासाठी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी बसवणे आवश्यक असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. नवीन नंबरप्लेट अनिवार्य असून, रत्नागिरी जिल्ह्यासाठी एम. एस. रिअल माझोन इंडिया ही एजन्सी निश्चित केली आहे. त्यासाठी https://hstpmhzone२.in या पोर्टलवर बुकिंग करावयाचे आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.