शहरात दोन महिन्यांपूर्वी झालेले डांबरीकरणाचे रस्ते पहिल्या पावसातच खड्ड्यात गेले आहेत. दर्जाहीन कामामुळे पालिकेला मनस्ताप झाला आहे. वाहनधारकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मारुती मंदिराजवळील रस्ते जेसीबीने उखडून काढण्याची नामुष्की पालिकेवर आली आहे रत्नागिरी शहरामध्ये काँक्रिटच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते करण्यात येत आहेत. त्यासाठी डांबरीकरणाचा एक सिलकोट मारण्यात आला होता. त्यामुळे रस्ता गुळगुळीत झाला; परंतु पहिल्या पावसातच मारुती मंदिर ते जेलनाक्यापर्यंत येणाऱ्या मुख्य मार्गाची चाळण झाली आहे.
खड्डे पडून डांबरीकरणाची बारीक खडी सर्वत्र पसरली आहे. यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत. मनसेने याबाबत पालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला होता. नागरिकांच्याही तक्रारी वाढल्या होत्या. पालिकेने याची दखल घेऊन आज चाळण झालेला रस्ता जेसीबीने उखडून काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे या दर्जाहीन कामाबाबत नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
वाहनचालकही हैराण झाले आहेत. जनतेचा पैसा पाण्यात घालवण्याचे काम ठेकेदार करत असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. रस्त्यातील संपूर्ण बारीक रेवा जेसीबीने गोळा करून पूर्वीचा रस्ता ठेवला आहे. त्यावर आता पावसाची उघडीप मिळाल्यानंतर पुन्हा रस्ता केला जाणार आहे. संबंधित ठेकेदाराकडून या कामाचा पैसा वसूल केला जाणार आहे.