आज पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून, सध्या सर्वत्र शाळा प्रवेशाच्या कागदपत्राची जमवाजमव करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी प्रवेश आणि शासकीय कामी विविध दाखल्यांची आवश्यकता भासते. मात्र सेतू कार्यालयाकडुन तांत्रिक अडचणींचे करण दाखवून ते उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
प्रांताधिकारी कार्यालयाकडून वेळीच सह्या होत नसल्याने विविध दाखले विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारीनंतर प्रांताधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून हा प्रश्न सोडवला असताना, आता सेतू कार्यालयातील प्रिंटर आणि स्कॅनर बंद पडल्याने पुन्हा एकदा दाखल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विविध शासकीय कामी लागणारे दाखले हे सेतू कार्यालयामार्फत जनतेला उपलब्ध मिळसतात. मात्र गेले काही दिवसांपासून या कार्यालयाकडील स्कॅनर प्रिंटर बंद असल्याने पुन्हा एकदा दाखल्यांसाठी विलंब होऊ लागला आहे.
राजापूर सेतू कार्यालयातील हे प्रिंटर स्कॅनर बंद पडल्याने पर्यायी व्यवस्था तात्काळ होणे आवश्यक असताना ती झालेली नसल्याने जनतेला या दाखल्यांसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. तर शाळा व महाविद्यालय प्रवेशासाठी नियोजीत वेळेत हे प्रवेश अर्जासोबत दाखले जोडावे लागत असल्याने विशेषत: विद्यार्थी वर्गाची गैरसोय होत आहे. तालुका महसुल प्रशासनाने दाखल्यां अभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन तात्काळ प्रिंटर स्कॅनर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे.
चिपळूण मध्ये देखील तशीच परिस्थिती उद्भवली आहे. अनेक दलालांना यामुळे आर्थिक आधार मिळत आहे. सरकारने ऑफलाइन शिबिर आयोजित करून दाखले दिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल, अशी मागणी सुरू झाली आहे. सरकारी दाखले काढताना विद्यार्थी दलालांच्या तावडीत सापडू नयेत, त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्र ऑनलाइन केले आहेत; परंतु चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात ऑनलाइन दाखल्यासाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून अधिक पैसे आकारत असल्याचे चित्र समोर येत आहे. शिवाय हे दाखले दहा ते बारा दिवसांनी मिळत असल्याने विद्यार्थी व पालकाना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे अनेक पालकानी ऑफलाइन दाखले देण्याची मागणी केली आहे.