रत्नागिरीमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव जास्तच वाढला आहे. त्यामुळे शासनाने वेगाने लसीकरण करण्यावर भार दिला आहे. लसीकरणासाठी सुद्धा विविध उपाययोजना राबविण्यात आल्यात. आणि कोरोनाचे वाढते संक्रमण पाहून लसीकरण केंद्रांवर उपलब्ध लसीपेक्षा दुप्पट तिप्पट प्रमाणात गर्दी वाढू लागल्याने कोरोना संक्रमणाचा धोका अजूनच वाढण्याची चिन्हे दिसू लागली. त्यामुळे लसीकरण नोंदणी ऑनलाईन करण्यात आली. परंतु, ऑनलाईन नोंदणीमध्येही अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे परिपत्रक काढण्यात येत आहे. त्यामध्ये स्थळ, वेळ, वयोमर्यादा आणि डोसची संख्या नमूद केली जात आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ३ लाख ८ हजार ९४४ डोस देण्यात आलेत, त्यामधील २ लाख ४६ हजार १० जणांनी एक डोस तर ६२ हजार ९३४ नागरिकांनी दोन्ही डोस घेतेले आहेत. मागील दोन महिन्यांमध्ये कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याने, नागरिकांनी लसीकरण करून घेण्यावर भार दिला. लसीकरणा बाबत होणाऱ्या उलट सुलट चर्चा, आणि अफवांमुळे लसिकरणाकडे सुरुवातील घाबरून दुर्लक्ष केले जात होते, परंतु आत्ता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जनतेचा लसीकरण करण्याकडे कल आहे.
डॉक्टर, पोलीस, आरोग्य अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांन लसीकरणासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले.स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सर्व फ्रंट लाईन वर्कर्स काम करत असतात. ग्रामीण भागातील जनतेला ऑनलाईन लसीकरणाची प्रक्रिया लक्षात येत नसल्याने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धत अवलंबण्यात आली आहे. जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रशासन त्यासाठी प्रयत्न करत आहे.