27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRatnagiriउद्घाटनाआधीच बांधकाममंत्री ना. रविंद्र चव्हाण निघुन गेल्याने चर्चाना फुटले पेव

उद्घाटनाआधीच बांधकाममंत्री ना. रविंद्र चव्हाण निघुन गेल्याने चर्चाना फुटले पेव

भाजप-शिवसेनेतील अंतर्गत धूसपूस तर त्याला कारणीभूत नाहीना अशी चर्चा रंगली आहे.

रत्नागिरीमध्ये गुरुवारी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वैद्यकिय महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. या उद्घाटन समारंभाला राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. रविंद्र चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले होते. ना. चव्हाण त्यासाठी रत्नागिरीत आले सुद्धा होते. मात्र कार्यक्रमाला उपस्थित न राहता ते मुंबईला निघुन गेल्याने नेमके काय झाले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरु झाली आहे. भाजप-शिवसेनेतील अंतर्गत धूसपूस तर त्याला कारणीभूत नाहीना अशी चर्चा रंगली आहे.

पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे रत्नागिरीकरांची वैद्यकिय महाविद्यालयची कित्येक वर्षांची मागणी पूर्ण झाली. रत्नागिरीत शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरु झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते या महाविद्यालयाच्या उ‌द्घाटनाचा कार्यक्रम गुरुवारी ३० नोव्हेंबरला करण्याची निश्चित तारीख या कार्यक्रमाला वैद्यकिय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले होते. निमंत्रण पत्रिकेमध्ये या दोन्ही नेत्यांची नावे नमूद करण्यात आली होती.

ना. चव्हाण आलेसुद्धा – या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ना. रविंद्र चव्हाण हे बुधवारी रात्रीच रत्नागिरीत दाखल झाले. शासकीय विश्रामगृहावर त्यांचा मुक्काम होता. गुरुवारी सकाळी त्यांनी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांशी अनौपचारीक चर्चा केली. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले असे कळते. काही पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीदेखील भाजपचे संपर्कमंत्री असलेल्या ना. रविंद्र चव्हाण यांनी घेतल्या. त्यानंतर ते २ वाजता होणाऱ्या उ‌द्घाटन समारंभाला उपस्थित राहतील असे अपेक्षित होते.

अचानक मुंबईला रवाना – मात्र ही अपेक्षा फोल ठरली. कारण गुरुवारी दुपारी १२.३० वा.च्या सुमारास ना. चव्हाण विश्रामगृहातून बाहेर पडले. थेट विमानतळावर गेले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने मुंबईला तातडीने रवाना झाले. वैद्यकिय महाविद्यालयाच्या उ‌द्घाटनासाठी बुधवारी रात्रीच रत्नागिरीत दाखल झालेले ना. रविंद्र चव्हाण अचानक मुख्यमंत्री येण्यापूर्वीच मुंबईकडे रवाना झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ते कार्यक्रमाला का थांबले नाहीत?. याची चर्चा सुरु झाली.

दौरा बदलला? – याबाबत भाजपा गोटातून असे सांगण्यात आले की, वैद्यकिय म हाविद्यालयाचे उद्घाटन आधी होणार होते आणि त्यानंतर लोटे येथील कोकाकोला कंपनीच्या भूमिपुजनाला मुख्यमंत्री जाणार होते. आधी रत्नागिरीत मुख्यमंत्री येणार म्हणून चव्हाण आले होते. मात्र अचानक लोट्याचा कार्यक्रम आधी ठरला आणि मुख्यमंत्री त्यानंतर रत्नागिरीला येणार ठरले. अचानक दौरा बदलल्याने रविंद्र चव्हाण मुंबईला निघुन गेले. कारण सायंकाळी त्यांना त्यांच्या डोंबिवली या मतदारसंघाचे एका महत्वाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहायचे होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सकाळी वैद्यकिय महाविद्यालयाचे उद्घाटनाला उपस्थित राहून दुपारी १.३० ते २ वाजता ना. चव्हाण मुंबईला निघणार होते. मात्र अचानक दौरा बदलला त्यामुळे ना. चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन आपल्याला दुपारी उपस्थित राहणे शक्य नसल्याचे कळवत ते मुंबईला रवाना झाले असे भाजपा गोटातून सांगण्यात येत आहे.

दौरा का बदलला ? – भाजपा गोटातून देण्यात आलेल्या या माहितीमुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक कसा काय बदलला की रविंद्र चव्हाण यांनी आपला दौरा बदलला असे दोन्ही प्रश्न चर्चेला येत आहेत. रत्नागिरीला आधी येण्याचा निर्णय अचानक का बदलला गेला आणि लोट्याचा कार्यक्रम आधी का घेण्यात आला असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत. खरंच दौरा बदलला की अन्य काही कारणांमुळे ना. रविंद्र चव्हाण तातडीने मुंबईला रवाना झाले याची चर्चा आता सुरु झाली आहे.

नेमके कारण काय? – कार्यक्रमाच्या वेळेत अचानक बदल झाल्याने रविंद्र चव्हाण निघुन गेले की अन्य कोणते कारण आहे याचीही उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. भाजप-सेनेमध्ये अंतर्गत धुसपूस तर यामागे नाहीना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular