गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी. तसेच चिपळूण शहरातील काही भागांत धोकादायक दरडींमुळे इमारतींना धोका निर्माण झाला असून या इमारतींच्या मागे बांधकाम व्यावसायिक अथवा नगर परिषदेने संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेतर्फे चिपळूण नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करतांना शहरातील समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी,’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, अशा घोषणा देऊन नगर परिषद परिसर दणाणून सोडला.
गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील सरिफा प्लाझा इमारतीमध्ये शेजारील डोंगराचा मोठा दगड सदनिकेत घुसला आणि सदनिकेचे मोठे नुकसान झाले. तसेच खेंड, ओझरवाडी, कांगणेवाडी, गोवळकोट, मतेवाडी, उक्ताड या भागात देखील इमारतींच्या जवळ धोकादायक दरडी आहेत. तरी भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी नगरपरिषद अथवा बांधकाम व्यवसायिकाने संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच मार्कंडी स्वामी समर्थ मठ ते रामतीर्थ तलाव, नवा भैरी मंदिर ते गांधारेश्वर मंदिर, नाईक कंपनी भेंडीनाका ते उक्ताड बायपास रोड अंतर्गत भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तर माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरील शहरातील काही भागात पथदिवे नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा मांडला. उपशहर प्रमुख सचिन उर्फ भैय्या कदम यांनी बीएसएनएल इमारतीच्या बाजूने असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामाकडेदेखील लक्ष द्यावे, अशी मागणी केली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, समन्वयक राजू देवळेकर, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, मनोज शिंदे, संदेश किंजळकर, उपशहर प्रमुख संतोष पवार ओंकार गायकवाड विभाग प्रमुख संजय गोताड निशांत जंगम मनोज कदम युवा सेना शहर अधिकारी: पार्थ जागुष्टे, सौ. स्वाती देवळेकर, सौ. अर्चना कारेकर, सौ रविशा कदम, सौ. हर्षाली पवार, सौ. श्रद्धा घाडगे आदी उपस्थित होते. यावर मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी आपण मांडलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.