मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये गरीब व गरजू लोकांना पोटभर जेवणाची सोय व्हावी यासाठी शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र,आता कोरोना संक्रमणाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द केला असून, तिचा दर पूर्वीप्रमाणे दहा रुपये प्रतिथाळी इतका करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून ही थाळी मोफत उपलब्ध नसून, सशुल्क उपलब्ध असणार आहे.
‘ब्रेक द चेन’ प्रक्रियेअंतर्गत राज्यात कोरोना बाधितांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात कमी होत असताना दिसत असून, राज्यात आता निर्बंध शिथील करण्यात आले सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध स्तरातील समाज घटकांसाठी मदत म्हणून जे पॅकेज जाहीर केले होते, त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिल पासून शिवभोजन थाळी अंतर्गत जेवणाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली होती.
आता राज्यातील कोरोनाची दुसरी लाट संपल्यातच जमा असल्याने सध्या परिस्थिती आटोक्यामध्ये आल्याने राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत वितरीत करण्याचा निर्णय रद्द केला असून, शिवभोजन थाळी पुन्हा १० रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. कोरोना काळात स्थानिक मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला या मोफत शिवभोजन थाळीमुळे निदान चांगल्या दर्जाचे जेवण मिळाल्याने मोठा आधार मिळाला होता.
शिवभोजन थाळी ३० सप्टेंबरपर्यंत मोफत असेल, नंतर तिचा दर पूर्ववत होऊन १० रुपये असा करण्याचा शासनादेश आज जारी करण्यात आला आहे.