रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या निष्ठावंत इच्छुक उमेदवारांना डावलल्यास त्या जागी बाहेरील उमेदवार दिल्यास पदाधिकारी यांनी राजीनामा देण्याचा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे भाजपचे माजी आमदार बाळ माने यांच्या प्रवेशाचा मार्ग खंडित झाला आहे. त्यामुळे राजेंद्र महाडिक व उदय बने यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपकडे गेला होता. त्याप्रमाणे त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून येत होते; परंतु शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी युती असूनही गुप्त पद्धतीने विरोधी मतदार करून पक्षाच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.
त्यामुळे त्यानंतर युती असूनही युतीचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. विरोधी पक्षाच्या उमेदवाराने आपले अस्तित्व निर्माण करून या विधानसभा मतदार संघावर वर्चस्व निर्माण केले. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करून उदय सामंत यांनी ऐन निवडणुकीच्या काळात खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे शिवसेनेला चांगले दिवस आल्याचे चित्र तालुक्यांमध्ये निर्माण झाले; परंतु अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे ज्या शिवसेनेला तालुक्यामध्ये गतिमान केले त्या शिवसेनेतून ते आपल्या समर्थकांसह व निष्ठावंत शिवसैनिकांना घेऊन शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दणका मिळाला. त्यानंतर निष्ठावंत व गद्दार अशा गोष्टींची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली.
आमदार उदय सामंत यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीमध्ये शह देण्याचे निश्चित धोरण करून निष्ठावंत शिवसैनिकांनी हालचाली सुरू केल्या. त्याप्रमाणे बंड्या साळवी, उदय बने व राजेंद्र महाडिक या इच्छुक उमेदवारांच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामध्ये काही दिवसांपूर्वीच बंड्या साळवी यांनी स्पर्धेतून माघार घेतली. याचा फायदा नेमका कोणाला होणार, हे निकालाअंती स्पष्ट होणार आहे. साळवींच्या माघारीमुळे दोघेच इच्छुक स्पर्धेत आहेत; मात्र या दरम्यान माजी आमदार बाळ माने मातोश्रीवर गेल्याच्या चर्चेन ठाकरे शिवसेनेत खळबळ उडाली. ठाकरे गटाच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे शस्त्र हाती घेतल्याने बाळ माने यांचा प्रवेश रखडला आहे. या मतदार संघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना जवळजवळ निश्चित आहे. वरिष्ठ पातळीवरून कोणाचे नाव निश्चित होते याबाबत अजूनही संभ्रम आहे. उमेदवार निश्वितीनंतरच रणांगणातील चित्र स्पष्ट होणार आहे.