25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRatnagiriरत्नागिरीतील 'त्या' रिक्षाचालकाने गळफास लावून केली आत्महत्या

रत्नागिरीतील ‘त्या’ रिक्षाचालकाने गळफास लावून केली आत्महत्या

काही दिवसांपूर्वी प्रवासी युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाने शनिवारी सकाळी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. दोनच दिवसांपूर्वी या रिक्षाचालकाची जामिनावर सुटका करण्यात आली होती. शनिवार सकाळी ७ वा.च्या सुम रास त्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली, असे पोलिसांनी माहिती देताना पत्रकारांना सांगितले. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

टेरेसवर आत्महत्या – या विषयी अधिक वृत्त असे की, रत्नागिरी शहराजवळील नाचणे येथील साईदीप गृहसंकुल, शांतीनगर याठिकाणी अविनाश म्हात्रे हा रिक्षा चालक रहात होता. शनिवारी सकाळी इमारतीच्या टेरेसवर या रिक्षा चालकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

असभ्यवर्तनाचा आरोप – काही दिवसांपूर्वी रिक्षातून जाणाऱ्या युवतीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप करणारी तक्रार या युवतीने दाखल करताच अविनाश म्हात्रे या रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली होती. दोन दिवसांपूर्वीच या रिक्षा चालकाची जामिनावर सुटका करण्यात आली होती. संबंधित युवतीने आपल्यासोबत जो प्रकार घडला त्या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यावर रत्नागिरीत संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस घटनास्थळी – या पार्श्वभूमिवर अविनाश म्हात्रे या रिक्षा व्यवसायिकाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनित चौधरी, प्रभारी पोलीस निरीक्षक मारुती जगताप आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची नोंद शहर पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular