लांज्यातील कोत्रेवाडी येथे डंपिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात अनेक महिने वाद विवाद सुरु असून ते अद्याप संपण्याचे नाव घेत नाही आहे. लांजा नगरपंचायत मार्फत कोत्रेवाडी येथे वस्ती लगत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे संपूर्ण वाडी ही बाधीत होणार असल्याने या प्रकल्पाला कोत्रेवाडी येथील ९० टक्के लोकांनी विरोध दर्शवला आहे. तसेच याबाबत कोत्रेवाडी येथील नागरिकांच्या वतीने वेळोवेळी आंदोलने, उपोषणे करण्यात आली असून प्रशासनाला याबाबत सर्व प्रकारची निवेदने देखील सादर करण्यात आलेली आहेत.
नगरपंचायत प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात या विरोधात दावा दाखल करण्यात आलेला आहे. गुरुवारी २१ जुलै रोजी नगरपंचायत प्रशासनाकडून तेथील नागरिक बळीराम कोत्रे यांना त्यांच्या जागेतून जाणारा रस्ता मोकळा करण्यासाठी सायंकाळी नोटीस देण्यात आली होती. मुळातच हा रस्ता मोकळा असताना तो मोकळा करण्याबाबत नोटिसा देण्यामागचा नेमका हेतू काय? असा सवाल ग्रामस्थ बळीराम कोत्रे यांनी उपस्थित केला.
सदरचा रस्ता हा आमच्या खासगी जागेतून जात असून तो कोणत्याही प्रकारे बंद करण्यातच आलेला नाही आहे, मात्र तरी देखील नगरपंचायत प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याच्या नावाखाली नोटिसा देणे म्हणजे डम्पिंग ग्राउंड प्रकल्पा साठीचा प्रशासनाचा सुरु करण्यात आलेला खटाटोप असल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे हा त्यांचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. तो प्रयत्न हाणून पाडला जाईल, अशी रोखठोक भूमिका बळीराम कोत्रे यांच्यासह संपूर्ण कोत्रेवाडी ग्रामस्थांनी घेतली आहे.
मुळातच बंद नसलेला रस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासनाकडून ग्रामस्थांवर दबाव आणणे कितपत योग्य आहे? रस्ता मोकळा करण्याच्या नावाखाली डंपिंग ग्राउंड प्रकल्पाचा हेतू आम्ही कदापी पूर्ण होऊ देणार नाही; हा प्रयत्न हाणून पाडला जाईल अशी रोखठोक भूमिका कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.

