रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात रत्नागिरीतील आंबा व्यावसायिकांच्या समस्येविषयी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ बागायतदार काका मुळ्ये यांनी अनेक अडचणी मांडल्या. शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न सोडवलेच जात नाहीत. रत्नागिरीतील आंबा व्यावसायिक हे कायम विविध अडचणींना सामोरे जात आहेत. आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधीच काय आम्हाला कोणीच वाली उरलेला नाही, अशी खंत व्यक्त मुळ्ये यांनी व्यक्त केले.
पूर्वी तीन फवारणीत कीडरोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत होता. अनेक औषधांमध्ये कीड नियंत्रणासाठी आवश्यक घटक नसतात. आता दहा ते बारा फवारण्या कराव्या लागतात. औषधांचा खर्च वाढला असून त्याच्या दरावर कुणाचेच नियंत्रण नाही. राज्य, केंद्र सरकारने बागायतदारांच्या या अडचणीकडे लक्ष दिले पाहिजे.
येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आंबा बागायतदार यांचे महत्वपूर्ण प्रश्न सोडविण्याकरिता मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली. श्री.सामंत पुढे म्हणाले, पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत आंबा बागायतदार यांचे प्रश्न सकारात्मकपणे सोडवले जातील, असा मला विश्वास आहे. युती सरकार हे समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेलं आपलं सरकार आहे.
श्री. सामंत म्हणाले, कोरोनाच्या मागील अडीच वर्षात आंबा बागायतदार यांच्यासाठी मंत्रालयात सकारात्मक बैठक कदाचित होऊ शकली नसेल. आंबा बागायतदार यांचे प्रश्न महत्वपूर्ण असून या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आलेली आहे. कोकणातील आंबा बागायतदार यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेऊ असे मुख्यमंत्री महोदयांनी आश्वस्त केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले युती सरकार हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार असल्याचा दावा कायम सरकार करत आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत – जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी युती सरकार कटिबद्ध आहे. असे यावेळी श्री.सामंत म्हणाले.