केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेली जीएसटी यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बाजू सांभाळताना कंबरडे मोडले आहे. महागाईच्या निषेधार्थ चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली येथे शुक्रवारी आंदोलन पुकारण्यात आले. तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली. यानंतर चिपळूण तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
मोदी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, जब जब मोदी डरता है तब तब ईडीको आगे करता है, सोनिया गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है, मोदी सरकार हाय हाय, कमी करा कमी करा वाढती महागाई कमी करा, अशा एकापेक्षा एक घोषणा देण्यात आल्या. सरकारने घाईघाईमध्ये निर्णय घेतलेल्या भारतीय सैन्यातील अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. एकूणच महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन मेटाकुटीस आले असून सामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे याविषयी काँग्रेस अतिशय आक्रमक बनली आहे.
केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे व चुकीच्या धोरणामुळे देशभरात अलिकडच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात महागाई वाढली. एकतर कोरोना काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने आणि कामधंदे देखील ठप्प झाल्याने आणि सद्य परिस्थितीत तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारीच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचबरोबर अग्निपथ योजना व जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीमध्ये वाढ केल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे शुक्रवारी दि. ५ ऑगस्ट तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडले. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत अवघा परिसर दणाणून सोडला.
केंद्र सरकारचा कारभार उद्योजक व बड्या कारखानदारांनाच पोषक राहिला आहे; परंतु देशातील सामान्य नागरिकांसाठी हे धोरण मारक ठरत असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवनदेखील महागाईमुळे अडचणीत आले आहे. महागाई विरीधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचे निर्देश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते.

