रत्नागिरी शहरातील मांडवी किनारी आज मोठ्या प्रमाणावर गौरी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम पार पडतो आजच्या गणपती विसर्जन मिरवणुकांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गावरील भुते नाका ते मांडवी किनाऱ्यापर्यंत स्थानिक हातगाड्या बंद ठेवाव्या किंवा अन्य हलवाव्या असा आदेश दिला होता.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (४) अन्वये दि. ५ सप्टेंबर २०२२ रोजी गौरी गणपती विसर्जन व दि. ९ सप्टेंबर २०२२ रोजी अनंत चतुर्दशी गणपती विसर्जना दिवशी मांडवी समुद्रकिनारी भुते पान शॉप ते मांडवी समुद्र किनारा या दरम्यान मांडवी समुद्र किनारी विसर्जन ठिकाणी गणपती मुर्ती घेवून येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून, तसेच मांडवी समुद्र किनारी हातगाडया, खेळण्यांची दुकाने मांडण्यास प्रतिबंध होणेकरीता मनाई आदेश देण्यात आले आहेत.
विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्थानिक हातगाडीवाले व विक्रेते यांची या वेळी मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ व अन्य वस्तूंची विक्री होत असते मात्र प्रशासनाने बंदी घातल्याने त्यांच्या पोटावर पाय येणार होता, प्रशासनाच्या या निर्णयाला मांडवी वासीयांनी विरोध केला होता.
ह्याची तात्पर्याने दखल घेत उदय सामंत यांनी आज सकाळी सात वाजता या परिसराला भेट दिली व पाहणी केली तसेच या विक्रेत्यांना त्या ठिकाणी बसवण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या. त्यांना ना. उदय सामंत यांनी न्याय मिळवून दिला. ह्यासाठी स्थानिक नगरसेवक बंटी किर ह्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांना शहरप्रमुख बिपीन बंदरकर आणि राजन शेट्ये यांनी सहकार्य केले.