कोरोनाचा महा भयंकर काळ दोन वर्षांनी सरला असून, अजूनही काही प्रमाणात रुग्ण देखील सापडत आहेत. त्या काळामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीच्या ठराविक फेऱ्या सोडल्या तर, बाकी संपूर्ण फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एसटीच्या सेवेसह आर्थिक बजेट देखील कोलमडले होते. ऐन आंब्याच्या हंगामात देखील एसटीच्या पार्सल देवा बंद ठेवण्यात आल्याने एक प्रकारचा घाटाच मंडळाला सहन करावा लागला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, लांजा, देवरूख, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड या बसस्थानकात पार्सल सेवा सुरू केली आहे. तरी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेली एसटी पार्सल सेवा कोरोना व एसटी कर्मचारी संपात बंद ठेवण्यात आली होती, ती सेवा आता सुरू करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाची ही पार्सल सेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी ग्राहकांनी पाठपुरावा केला होता. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एसटी पार्सल सेवा सुरू झाली आहे. त्याचा व्यापारी बंधूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी पार्सल सेवेच्या मे. गुणीना कमर्शियल प्रा. लि. मुंबई कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
ही सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या माध्यमातून राज्यात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान व अतिजलद वेगाने देण्यात येते. ती किसनलाल गेहीराम कंपनी यवतमाळ प्रस्तावित पार्सल परवाना धारक मे. गुणीना कमर्शियल कंपनीतर्फे राज्यभरात देण्यात येत आहे. दसरा-दिवाळी सणाच्या पाश्वर्भूमीवर व्यापारी मुंबई-पुणे येथून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करून विक्रीसाठी कोकणात एसटी पार्सलने पाठवत असतात. या सणाच्या पूर्वीच पार्सल सेवा सुरू झाल्याने व्यापारीबंधूंनी समाधान व्यक्त केले आहे.