राज्यातील महत्वाच्या ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये डॉ. बी. एन.पाटील यांच्या जागी एम. देवेंदर सिंह यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवेतील २०११ च्या बॅचचे आय.ए.एस.अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी दिल्ली येथे बँकिंग क्षेत्रात सेवा बजावलेली आहे. ५ वर्षांच्या या खाजगी क्षेत्रातील बँक सेवा कालावधीत रिझर्व बँक ऑफ इंडिया अशी त्यांच्या कामाचा निकटचा संबंध होता. पुणे येथे असलेल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक म्हणून देवेंदर सिंह कार्यरत होते. पुणे येथे संचालक पदापूर्वी त्यांनी आधी अकोला आणि चंद्रपूर येथे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व नंतर यवतमाळ व बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे.
तर मावळते जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांची मुंबई येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर नियुक्ती झाल्याने ते तेथील पदभार स्वीकारत आहेत. देवेंदर सिंह यांनी आयआयटी रुडकी येथून संगणक अभियांत्रिकी व नंतर एम.बी.ए केलेले आहे. आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी सदीच्छा भेटीसाठी आलेल्या पत्रकारांशीही संवाद साधला.
जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, कोकण आणि विशेष करून रत्नागिरी जिल्हा नैसर्गिक सौंदर्याची खाण आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी असलेल्या नैसर्गिक गोष्टींवर आधारित उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातील अशी एक प्रकारे ग्वाही त्यांनी दिली आहे.