मागील वर्ष २०२१ सालापासून मिऱ्या ते कोल्हापूर या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात येण्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. भूसंपादनाचे काम देखील पूर्णत्वास आल्याने, लवकरच मार्ग सुकर होणार आहे.
भारतीय राजमार्ग प्राधिकरणाने रत्नागिरी – कोल्हापूर या १३४ किमी अंतराच्या चौपदरीकरणासाठी २९०० कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली होती. मात्र, अनावश्यक खर्च टाळत या टप्प्यात आता प्रत्यक्षात २७५५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या मिऱ्याबंदर रत्नागिरी ते चोकाक कोल्हापूर या टप्प्यात १४५ कोटी रुपयांची बचत झाली आहे. मंजूर निधीपेक्षा कमी रकमेच्या निविदा झाल्याने ही बचत झाली आहे. भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
मिऱ्याबंदर ते आंबा या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील कामासाठी ९३० कोटी रुपयांची निविदा आहे. आंबा ते पैजारवाडी या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ८३९ कोटी रुपयांची निविदा आहे. तर पैजारवाडी ते चोकाक या टप्प्यातील कामासाठी ९८६ कोटी रुपयांची निविदा मंजूर आहे. अशी माहिती भारतीय राजमार्ग प्राधिकरणाचे अभियंता चंद्रकांत भरडे यांनी दिली आहे.
रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भू संपादन प्रक्रियेत शासनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली आहे. रेडीरेकनरच्या चौपट दर मिळाल्याने अनेकांच्या खात्यामध्ये कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई जमा झाली आहे. योग्य निवाडा न झालेली काही प्रकरणे व करवीर तालुका मात्र याला अपवाद राहिला आहे. उर्वरित कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा व हातकणंगले तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याचे संकेत दिसून येत आहेत.

