रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे सुपुत्र मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं सोमवारी सकाळी अल्पकालीन आजाराने रूग्णालयात निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने नाट्य तसेच चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून पु.ल. ‘देशपांडे यांचा ‘अंतू बर्वा’ अजरामर करणारा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. जयंत सावरकर गेले काही दिवस आजारी होते. रविवारी संध्याकाळपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. सोमवारी त्यांची प्रकृती जास्तच बिघडली आणि सकाळी ११ वा. च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयंत सावरकर यांचा मुलगा कौस्तुभ सावरकर यांनी ही माहिती दिली. अनेक कलाकार घडवण्याचं कामही त्यांनी केलं.
शेवटच्या क्षणापर्यंत ते रंगभूमीवर काम करण्यासाठी सक्रिय होते. त्यांना अनेक कलाकार अण्णा म्हणून हाक मारत होते. समांतर या सुहास शिरवाळकरांच्या कादंबरीवर आधारीत वेब सीरिजमध्ये त्यांनी ज्योतिष्याची भूमिका केली होती. पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकावर आधारीत त्याच शीर्षकाच्या नाटकात त्यांनी अंतू बर्वा ही भूमिका साकारली होती. ती भूमिका लोकांच्या आजही स्मरणात आहे. त्यामुळे जयंत सावरकर यांच्या निधनाने पु.लं.चा अंतू बर्वा अजरामर करणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वात सात दशकांहून अधिक काळ जयंत सावरकर कार्यरत होते.
जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरम ध्ये झाला. त्यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करत होता. त्याच्याकडे जयंत सावरकर आले आणि गिरगावातच त्यांचं वास्तव्य दीर्घकाळ होतं. आपल्या कारकिर्दीची सुरुवातीची बारा वर्षे त्यांनी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. त्याचवेळी ते नोकरीही करत होते. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक आणि कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केलं. हौशी नाट्य संस्थांम धून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित किंग लिअर या नाटकात मास्टर दत्ताराम यांच्यासह जयंत सावरकर यांना काम करण्याची संधी मिळाली. हे नाटक फार चाललं नाही मात्र जयंत सावरकर यांनी केलेली विदुषकाची भूमिका चांगलीच गाजली.
१०० नाटकांमध्ये अभिनय – १०० पेक्षा जास्त नाटकांमध्ये, तर हिंदी आणि मराठी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. जयंत सावरकर यांनी अनंत दामले, केशवराव दाते, जयराम शिलेदार, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रामदास कामत, राजा परांजपे, सुरेश हळदणकर यांच्यासह अद्वैत दादरकर, मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी, समीर विद्वांस या आणि अशा अनेक जुन्या नव्या पिढीतील दिग्दर्शकांसह काम केलं आहे. जयंत सावरकर यांनी तीसपेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्येही कामं केली आहेत. ९७ व्या नाट्य परिषदेचं अध्यक्षपदही जयंत सावरकर यांनी भुषवलं आहे.
गाजलेली नाटके – जयंत सावरकर यांनी ‘अपराध मीच केला’, ‘अपूर्णांक’, ‘आम्ही जगतो बेफाम’, ‘एकच प्याला’, ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सूर्यास्त’, ‘सूर्याची पिल्ले’ अशा एकाहून एक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्यांनी छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम केले होते. जयंत सावरकर हे गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात वास्तव्य करत होते. जयंत सावरकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी (२५ जुलै रोजी) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मराठी सिनेविश्व, नाट्यविश्व आणि मालिका विश्वावर जयंत सावरकर यांच्या निधनाच्या बातमीने शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा कौस्तुभ आणि मुलगी सुवर्णा तसंच सुषमा असं कुटुंब आहे.