माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस नीलेश राणे यांनी सक्रिय राजकारणापासून दूर जात असल्याचे जाहीर केल्याने सिंधुदुर्गाच्या राजकारणात खळबळ उडाली होती; मात्र आज त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राणेंची दोन तास बैठक झाली. यात राणे यांना येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. त्यामुळे यापुढेही नीलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचा झंझावात सुरू राहणार असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मुंबईत जाहीर केले. नीलेश यांनी मंगळवारी (ता. २४) एक्स (ट्विटर) या सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यात त्यांनी आपण सक्रिय राजकारणातून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यांची भाजपमध्ये होणारी घुसमट, कुडाळ-मालवण मतदारसंघात उमेदवारी मिळण्याबाबत अनिश्चितता आदी अनेक मुद्दे चर्चिले जात होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चव्हाण यांनी आज नीलेश यांची भेट घेतली. यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर या तिघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. राणे यांच्या नाराजीचे नेमके कारण आम्हाला समजले आहे. त्यावर आम्ही तोडगा काढू. कुठल्याही छोट्या कार्यकर्त्यांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, असे बैठकीनंतर पालकमंत्री चव्हाण यांनी जाहीर केले. ते म्हणाले, “राणेंच्या सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा आम्हाला मोठा धक्का बसला होता.
त्यामुळे आम्ही आज तातडीने केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा केली. आज सकाळी थेट नीलेश यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही राणेंचे सर्व मुद्दे ऐकून घेतले. राणेंच्या बाबतीत असं काही तरी घडलं होतं की त्यामुळे त्यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. संघटनेत काम करताना छोट्या छोट्या कार्यकत्यांवर अन्याय होऊ नये, याबाबत नीलेश राणे यांनी ठाम भूमिका घेतली होती. छोट्या- छोट्या कार्यकत्यांना येणाऱ्या अडचणीत पक्षातील नेत्यांनी समजून घ्यायला हव्यात, अशी राणेंची भूमिका होती. कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहचत नाहीत, यादृष्टीने त्यांनी रागावून हा निर्णय घेतला; परंतु मी, नारायण राणे, नीतेश राणे आणि देवेंद्र फडणवीस आम्ही सर्वजण लक्ष घालू असे त्यांना आश्वासित केले आहे.”