महाराष्ट्रात मराठा आंदोलन तीव्र होत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राज्य परिवहन महामंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या काही फेऱ्या पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवल्या आहेत. ५० फेऱ्या बंद केल्याची माहिती रत्नागिरी विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे दररोजच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. एसटीच्या रत्नागिरी विभागातून कोल्हापूर, पुणे, बीड, लातूर, बेळगाव आदी भागांमध्ये फेऱ्या सोडण्यात येतात; परंतु या फेऱ्या आजपासून बंद करण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी एसटीवरही दगडफेक, जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला.
जिल्ह्यातील सुमारे ५० फेऱ्या बंद झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी छेडलेल्या आंदोलनाला राज्यात ठिकठिकाणी हिंसक वळण लागले आहे. याचा फटका चिपळूण आगारालाही बसला आहे. चिपळूण आगारातून सोडण्यात येणाऱ्या पुणे, अक्कलकोट, बीड, बेळगाव आदी बसफेऱ्या रद्द केल्या आहेत. पोफळीच्या पुढे कुंभार्ली घाटातून चिपळूण आगारातील एकही बस जात नसल्याची माहिती आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा मंगळवारी सातवा दिवस होता.
त्यांची प्रकृती खालावली असतानाच त्यांच्या समर्थनार्थ गावागावांत उपोषण व आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यभर या आंदोलनाचा वणवा भडकला असून ठिकठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटनांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतांशी ठिकाणची एसटी सेवाही ठप्प झाली आहे. चिपळूण आगारालाही या आंदोलनाचा फटका बसला आहे. प्रामुख्याने पोफळीच्या पुढे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या बसेस बंद झाल्याने सोमवारी प्रवाशांचा खोळंबा झाला. या मार्गावर प्रवास करणारे अनेक प्रवासी चिपळुणात अडकून होते. त्यांनी खासगी वाहनांच्या आधारे प्रवास करण्यास पसंती दिली.
१० फेऱ्या रद्द – अनुचित प्रकार टाळण्यासाठी चिपळूण आगारातून अक्कलकोट मार्गावरील दोन फेऱ्या, बीड मार्गावरील एक फेरी व बेळगाव मार्गावरील दोन, पुणे, मिरज, सातारा, कराड, कवठेमहाकांळ, जत आदी १० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या दहा फेऱ्या रद्द झाल्याने चिपळूण आगारातील एसटीचे सुमारे २८६० किमी रनिंग कमी झाले आहे.
दोन लाखांचे नुकसान – मराठा आंदोलनामुळे सोमवारी (ता. ३०) १८ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे साधारण ७३०४ किलोमीटर रद्द झाले. त्यामुळे २ लाख ४ हजार ५१२ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली. मुंबईमध्ये एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, त्यामार्फत राज्याचा आढावा घेण्यात येत आहे.