29.8 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiriजिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी कसली कंबर, २५ जणांचा तडीपारीचा प्रस्ताव

जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी कसली कंबर, २५ जणांचा तडीपारीचा प्रस्ताव

अंमली पदार्थाची ही तस्करी व विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी काहींच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत.

अंमली पदार्थांची विक्री थांबविण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी २५ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. तडीपारीनंतर अंमली पदार्थांची विक्री थांबेल किंवा कमी होईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यात गांजा विक्रीप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी आठजणांवर कारवाई केली आहे. या कारवाईनंतर गुहागरात १ किलो ३९० ग्रॅमचा गांजा जप्त करण्यात आला होता. तर, रत्नागिरी शहरातील कर्ला परिसरात ४२ ग्रॅमचे ब्राऊन हेरॉइन जप्त करण्यात आले होते.

ही अमली पदार्थांची होणारी तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यात धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात आसाम, सातारा, पंढरपूर या भागांतून गांजा हा अमली पदार्थ आणला जात आहे. तर, मुंबईसारख्या महानगरांमधून ब्राऊन हेरॉइन हा अंमली पदार्थ आणून त्याची विक्री केली जात असल्याचे तपास पुढे आले आहे. हा अमली पदार्थ कोणत्या मार्गाने जिल्ह्यात येत आहे, याचा शोध घेतला जात आहे. अंमली पदार्थाची ही तस्करी व विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी काहींच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत.

यामध्ये २५ जणांना जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. लवकरच ही कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. जिल्ह्यात आसाम भागातून मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. तेथील काही धागेदोरेही हाती लागले आहेत. त्यादृष्टीने आता पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच गांजा विक्रीच्या मुळापर्यंत पोहोचून जिल्ह्यातून अमली पदार्थ हद्दपार करणार असल्याचेही पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. आसपासच्या काही जिल्ह्यांतूनही रत्नागिरीत गांजा येतो. त्याचीही बारकाईने माहिती घेतली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular