महिन्याला साधारण ९९ कोटी ११ लाखांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या जिल्ह्यातील ५ लाख ९९ हजार ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार सेवा देण्याच्यादृष्टीने महावितरण कंपनीचा प्रयत्न आहे. ग्राहकांचे समाधन करणारी सेवा देण्याची मोठी जबाबदारी महावितरण कंपनी पेलत आहे. ग्राहक हेच सेवेचा केंद्रबिंदू मानून महावितरण कंपनी रविवारी (ता. २४) राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करत आहे. ग्राहकांचे समाधान करणे हीच आमची जबाबदारी असल्याचे महावितरण कंपनीने स्पष्ट केले आहे. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
या कायद्यामुळे ग्राहकाला सुरक्षेचा, माहितीचा, निवड करण्याचा, म्हणणे मांडण्याचा, तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा व ग्राहक हक्काच्या शिक्षणाचे अधिकार मिळाले आहेत. विद्युतक्षेत्रात विद्युत कायदा २००३ द्वारे विद्युतनिर्मिती, पारेषण व वितरण क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा स्वीकारल्या असून, त्यात विद्युत ग्राहकांचे हित जपण्याच्या तरतुदींचा समावेश आहे. ग्राहकांच्या हक्कांसाठी महावितरण सदैव जागरूक आहे. महावितरणने मीटरवाचन व देयक प्रणालीत सुसूत्रता आणली आहे. केंद्र व राज्य शासनाने ‘इज ऑफ लिव्हिंग’ धोरण स्वीकारले आहे. या धोरणानुसार महावितरणकडून ग्राहकांना तत्परतेने नवीन वीजजोडणी, जलदगतीने तक्रारींचा निपटारा केला जात आहे.