चिपळुणात उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून सर्वांना तातडीची मदत मिळावी यासाठी एनडीआरएफचे जवान देखील दाखल झालेले आहेत. चिपळुणात आलेल्या महापुराचे थैमान २४ तास उलटलेत तरी देखील कायम आहे आणि चिपळूण येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
काल दुपारनंतर महापुराचे पाणी ओसरू लागल्याने मदत कार्याला वेग आला असून शंकरवाडी, वडनाका आणि बाजारपेठेमध्ये आता पुराचे पाणी बऱ्यापैकी ओसरले आहे एनडीआरएफ, आर्मी, नौदल, हवाई दल आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून बोटींच्या साहाय्याने मदत कार्य सुरू आहे. आतापर्यंत जवळपास २२०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. काल दुपारनंतर पुराचे पाणी जरी ओसरू लागले असले तरी धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित निवास स्थळांमध्ये स्थलांतरित व्हावे असे आवाहन केले आहे. या महापुराचा फटका वाहतुकीला देखील बसला असून वाशिष्ठी नदीवरील पुलाचा काही भाग हा वाहून गेला आहे त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे
चिपळूण शहरात बुधवारी रात्री साडेदहा वाजल्यापासून वेगाने पुराचे पाणी घुसले होते आणि त्याचमुळे जवळपास दहा फुटापर्यंत पाण्याची पातळी वाढून शहरी भागातील घरे आणि दुकाने पूर्णपणे पाण्याखाली गेली होती चिपळुणातील या महापुरामुळे एकूण १२ नागरिकांचा बळी गेला आहे. यासर्व दरम्यान शुक्रवारी दिवसभर बचावकार्य हे सुरू होते पुरामध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांना लवकरात लवकर सुखरूप पणे बाहेर काढले जाईल अशी माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.