मुंबईतील खास बाल कोविड काळजी केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन आज उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलताना म्हणाले कि, राज्यातील ऑक्सिजन साठ्यामध्ये फार काही विशेष वाढ झालेली नाही. राज्यात कोविड रुग्णांसाठी ७०० मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन जेव्हा लागेल तेव्हा कदाचित आपल्याला राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असताना, आज जनतेच्या सेवेसाठी दोन आरोग्यसेवेचे लोकार्पण झालं आहे. इतर देशामध्ये , राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेला आहे. आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही, तरी आपण सर्व गोष्टींची पूर्व तयारी ठेवत आहोत, असं ते म्हणाले. त्या अनुषंगाने लहान मुलांना कोविडची लागण झाली तर, त्यांना रूग्णालयाच्या वातावरणाची भीती न वाटता चांगले आणि किड्स फ्रेंडली वातावरण राहण्यासाठी असे सेंटरचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, आता सुद्धा मी मोठ्या प्रमाणात गर्दी बघितली, अशी गर्दी करणे योग्य नाही आहे. आपण सर्व काळजी घेऊन अर्थचक्र सुरू राहावे यासाठी काही निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मी सर्वांना विनंती करतो कि, कोणतेही राजकीय स्वार्थ अथवा आपल्या स्वतःचे स्वार्थ यासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असा वर्तन करू नका.
त्याचप्रमाणे, कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही, आपल्याला निर्बंध पाळून ते टाळायचा आहे. आपण जर नियम पाळले नाही तर कदाचित तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकरच येण्याचा संभव आहे. पुन्हा लॉकडाऊन लावायला नको असेल तर, कोणीही कितीही चिथावल असेल, भडकवलं तरी त्यांच्या चिथावणीला दाद देउ नका. सर्व राजकीय पक्षांना, धार्मिक, सामाजिक संघटनाना मी विनंती करतो आपल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येईल असं कोणतेही कृत्य करू नका.