गेल्या १५ दिवसांपासून रत्नागिरीमध्ये बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरचा विषय चर्चेत आहे. त्या प्रकरणी मुंबई एटीएसच्या माहितीवरून रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई केलेली. या कॉल सेंटर वरून आखाती देशात दहशतवादी बेकायदेशीरपणे कॉल करण्यात आले असे पोलिसांचे म्हणणे होते. या सेंटरचा वापर परदेशात देशविरोधी कारवायांसाठी केला जात आहे का? याची देखील पोलिसांकडून कसून झाडाझडती केली जात होती.
रत्नागिरी पोलिसांनी एटीएसच्या मदतीने १४ ऑगस्टला रत्नागिरीतील बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटर प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. सेंटरचे सर्व साहित्य जप्त करून आठवडाबाजारातील श्रीटेक मोबाईल शॉपच्या मालकासह, पनवेल येथून रत्नागिरीमध्ये आलेल्या एकाला सापाला रचून साळवी स्टोप येथेच अटक करण्यात आली होती.
बेकायदेशीर आंतराष्ट्रीय कॉल गुन्ह्यामध्ये संशयित म्हणून श्रीटेक मोबाईल शॉपचे मालक अलंकार विचारे आणि फैसल रजाअली रजा सिद्दीकी या दोघांना अटक करण्यात आलेली. अटकेची मुदत संपत आल्यावर त्यांना पुढील कारवाईसाठी न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता आरोपींतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की या प्रकरणी कोणतेही संशयास्पद किंवा दहशतवादी कृत्य करण्यात आले नाही आणि नव्हते.
आज २३ ऑगस्ट रोजी पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कस्टडी मध्ये पुन्हा २ दिवसांची वाढ मागितली होती. परंतु, प्रमुख आरोपी फैसल रजा अली रजा सिद्दीकी यांच्यातर्फे ऍड. संकेत घाग तर आरोपी अलंकार विचारे यांच्यातर्फे ऍड. भाऊ शेट्ये यांनी काम पाहिले. आरोपींतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की या प्रकरणी कोणतेही संशयास्पद किंवा दहशतवादी कृत्य करण्यात आले नाही आणि नव्हते. आरोपींनी शासनाचा कोणताही महसूल बुडवलेला नाही. न्यायालयात आज आरोपींतर्फे सदर सिस्टीमचे आणि सिप ट्रंकचे जिओचे अधिकृत बिल आणि बिल भरणा पावती सादर करण्यात आली. न्यायालयाने आरोपीची प्रत्येकी १५०००/- च्या जामिनावर मुक्तता केली आहे. त्याचप्रमाणे दर आठवड्याचे दर गुरुवारी आरोपीना पोलीस स्टेशनला हजर राहण्याची व पुराव्याशी कोणत्याही प्रकारची छेडछाड न करण्याची अट घालण्याच्या अटीवर जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.