रत्नागिरीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची वादग्रस्त बोलण्यामुळे झालेल्या अटक सत्रामुळे स्थगित झालेली भाजपाची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सकाळी रत्नागिरीमध्ये आगमन झाले असून जनआशीर्वाद यात्रा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ज्या भागातून हि आशीर्वाद यात्रेचा प्रारंभ होणार आहे, त्या मारुती मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झालेले, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
२४ ऑगस्ट रोजी उडालेल्या राजकीय गोंधळामुळे जिल्ह्यात ३१ ऑगस्ट पर्यंत मनाई आदेश जारी केला असतानाही, भाजपने जनआशीर्वाद यात्रा काढण्याची भूमिका कायम ठेवली आणि त्यानुसार मंत्री नारायण राणे यांचे ठरलेले कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत.
रत्नागिरी विमानतळावर सकाळी ठरलेल्या रुपरेषेप्रमाणे मंत्री राणे यांचे आगमन झाले. अकरा वाजता मारुती मंदिर येथिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि तेथून त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर माजी खासदार लोकनेते स्व. शामराव पेजे तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करुन ते गोळप येथिल आंबा व काजू उत्पादकांच्या बैठकीसाठी रवाना झाले.
पत्रकारानी त्यांना विचारण्यात आलेल्या सेनेच्या प्रश्नावरून, पहिल्यांदी काहीही प्रतिक्रिया न देता पुढील बैठकीमध्ये मात्र त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. माझा आवाज सध्या बसला असून, आवाज खणखणीत झाला की पुन्हा खणखणीत वाजवणार, असा सूचक पण अप्रत्यक्ष इशाराच नारायण राणेनी दिला आहे. त्याचप्रमाणे, मीही शिवसेनेत होतो, त्यामुळे सर्व जाणून आहे. सर्व जुनी नवी प्रकरणं टप्याटप्याने बाहेर काढणार. भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणं ज्ञात आहेत. सुशांत सिंघ रजपूतची केस अजून संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण देखील अजून बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. जो कायदा तुम्हाला, तोच कायदा आम्हालाही लागू आहे. त्यामुळे दादागिरी करू नका, असा सज्जड दमही राणे यांनी भरला आहे.