राज्यातील ‘ऑपरेशन शिवधनुष्य’चा आरंभ जानेवारीत रत्नागिरी मतदारसंघात होऊन उबाठातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत मेगा पक्षप्रवेश झाला होता. आता पुन्हा एकदा ठाकरे शिवसेनेला खिंडार पडणार असून १५ फेब्रुवारी रोजी शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या दिवशी रत्नागिरीत येणार आहेत. यावेळी देखील उबाठातील अनेकजण शिवसेनेत प्रवेश करतील, असे शिवसेना नेते आणि पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा आभारासाठी आहे. या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी शिवसेना कार्यकारिणीची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. या आभार दौऱ्यात शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठातील अनेक पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, विद्यमान पदाधिकारी देखील शिवसेनेत पक्षप्रवेश करतील असे सामंत यांनी सांगितले.
बने, कदम शिंदेंना भेटले – शिवसेना पक्षप्रवेशाचा शृंखला ही अशा कायम राहणार आहे. रत्नागिरीतील उबाठाचे ज्येष्ठ नेते, संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांनी नुकतीच ‘काशिनाथ घाणेकर सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्या भेटीत शिंदे यांच्याशी त्यांची सकारात्मक चर्चा झाली. उबाठा सोडून एकनाथ शिंदेंचे नेतृत्व ते स्विकारतील असं मानायला हरकत नसल्याचे सामंत म्हणाले.
मिशन टायगर – शिवसेनेच्या माध्यमातून ‘मिशन टायगर’ हाती घेण्यात आले आहे. शिवसेनेकडून कोणतेही आमिष न दाखवता अनेकजण मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेत आहेत. त्यामुळे आम्ही कोणाला फोडत नाही, कोणाला शिवसेनेत येण्याचा आग्रह देखील करत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचे सिद्ध झाल्याने उबाठाचे कार्यकर्ते आपणहून मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेत असल्याचा दावा ना. सामंत यांनी सांगितले.
वज्रमूठ कितीकाळ टिकणार? – दिल्लीत ऐक्याची वज्रमूठ दाखविण्यात आली असल्याचे संजय राऊत यांनी विधान केले होते. पण माझ्या मनात काय चाललंय ते समोरा ओळखू शकलेला नाही, तसं उबाठातील त्या आठ खासदारांच्या मनातील कोण ओळखू शकणार?, ती वज्रमुठ काय आणि किती दिवस टिकणार हे पहावे लागेल असेही सामंत म्हणाले. लाडकी बहीण योजना मागील विधानसभा निवडणूकाया काळात आचारसंहिता होती. त्यामुळे छाननीला वेळ लागला होता. पण ही योजना बंद होईल असा गैरसमज विरोधकांतून पसरवला जातोय, त्यात काहीही अर्थ नाही, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.