27.3 C
Ratnagiri
Thursday, March 13, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeRatnagiriरत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचा कायापालट

रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचा कायापालट

अंमलबजावणी प्रत्येक सरकारी कार्यालयाने करणे बंधनकारक केले आहे.

शासनाच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कार्यालयांच्या स्वच्छतेसह त्यांच्या सुशोभीकरणाचे, कामांमध्ये सुसूत्रता आणि ती जलदगतीने करण्याचे आदेश देण्यात आले. त्या अंतर्गत रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचा पूर्णपणे कायापालटच झाला आहे. पोलिस ठाण्याचा परिसर स्वच्छ करून इमारतीची रंगरंगोटी, माहिती फलक, जुन्या मुद्देमालाची निर्गती, नागरिकांचे अर्ज तत्काळ मार्गी लावणे, जुन्या गुन्ह्यांची उकल, प्रतिबंधात्मक कारवाई, अदखलपात्र गुन्ह्यांची निर्गती ही कामे अधिकारी, अंमलदारांकडून करून घेत पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी सात कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी केली आहे. शासनाच्या या कार्यक्रमांतर्गत शहर पोलिस ठाणे सजवले आहे. नागरिकांचे आलेले अर्ज निकाली काढण्यातही शहर पोलिस अग्रेसर आहे. राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता.

त्याची अंमलबजावणी प्रत्येक सरकारी कार्यालयाने करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरकर यांनी शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार यांना १०० कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी कामांचे वाटप करून दिले होते. ठाण्याचा परिसर स्वच्छ केला असून, परिसरात गुन्ह्यातील गाड्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. इमारतीच्या मागील बाजूला साफसफाई करून तिकडे ठेवण्यात आल्या. पुढील भाग पूर्णतः मोकळा करून तो स्वच्छ करून घेतला. दर्शनी भागात शहर पोलिस ठाण्याची हद्द दर्शवणारा फलक लावला आहे. त्यावर हद्दीतील प्रमुख ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, मशिद यांसह महत्वाच्या ठिकाणांचा उल्लेख केला आहे.

नागरिकांसाठी असलेल्या प्रतीक्षागृहात नागरिकांच्या हक्काच्या अधिकारांचे फलक लावले आहेत. निरीक्षक दालनासह पोलिस ठाण्यातील इतर महत्वाच्या कक्षांच्या पाटी लावून नामकरण केले आहे. त्यामुळे नागरिकांना ज्या ठिकाणी आपले काम आहे तेथे सहज जाता येणार आहे. लोकसहभागातून ठाण्याच्या इमारतीवर दोन पाण्याच्या टाक्या बसवल्या आहेत. त्यामुळे २४ तास पाणी उपलब्ध झाले आहे. ठाण्याच्या दर्शनी भागात बांधकाम करून झाडे लावली आहेत. कर्मचाऱ्यांच्या जुन्या वसाहतीच्या मागील बाजूला नव्याने पार्किंग केले आहे. त्यामुळे दर्शनी भागात केवळ अत्यावश्यक कामासाठी गरजेची असलेली वाहने उभी राहणार आहेत.

शंभर टक्के कामाची पूर्तता करण्याचा प्रयत्न – केवळ इमारत रंगरंगोटी आणि परिसर स्वच्छतेवर ते थांबले नाहीत, तर कर्मचाऱ्यांना नवीन कायद्याबाबत ज्ञान, तपासाच्या आधुनिक पद्धती, न्यायालयात गुन्हे कसे सादर करावेत, ई-साक्ष अॅप प्रशिक्षण आदी देण्याचे काम सुरू आहे. जुन्या मुद्देमालाची निर्गती, नागरिकांचे अर्ज तत्काळ निकाली, जुन्या गुन्ह्यांची उकल, प्रतिबंधात्मक कारवाई, अदखलपात्र गुन्ह्यांची निर्गती आदी अंमलदारांकडून करून घेत शंभर टक्के कामाची पूर्तता करण्याचा प्रयत्न शिवरकर यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular