चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात शनिवारी पहाटेच संरक्षक भिंत कोसळल्याने रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली असून, रेलिंगही निखळले आहे. हजारो अवजड वाहने दररोज या मार्गावरून जात असल्याने अपघाताची भीती वाढली आहे. प्रशासनाने केवळ दगड लावून तात्पुरती सोय केल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात अचानक शनिवारी पहाटे ही घटना घडली. खोल दरीच्या काठावर असलेली भिंत आणि लोखंडी रेलिंग कोसळले आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने, रस्ता खचल्यास घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना म्हणून फक्त दगड लावले असले तरी, हे अपुरे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यात दृश्यमानता कमी असल्याने आणि अवजड वाहतुकीमुळे आधीच वाहतुक कोंडी होते. त्यात आता संरक्षक भिंत कोसळल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे तातडीने कायमस्वरूपी बांधकाम आणि लोखंडी रेलिंग बसविण्याची मागणी होत आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे घाटरस्त्यावर दरड कोसळणे, झाडांच्या पडझडीसह अनेक घटना घडत आहेत. वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने वाहतूक कोंडीही वाढली आहे. कुंभार्ली घाटांत संरक्षक भिंत कोसळल्यानंतरही प्रशासनाने अद्याप कोणतीही मोठी यंत्रसामग्री पाठवली नसल्याने, स्थानिकांनी उच्च आणि जिल्हा प्रशासनाशी, संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.