महाराष्ट्र सरकारने वाहनांच्या सुरक्षेच्यादृष्टीने १ एप्रिल २०१२ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट) बंधनकारक केली आहे; मात्र यासाठी पुन्हा १५ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतरही ‘एचएसआरपी’ नसलेल्या वाहनांवर वायूवेग पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश परिवहन आयुक्तांकडून काढण्यात आले आहेत. जिल्ह्यात २ लाख ११ हजार ४२३ वाहने असून आतापर्यंत ७० हजार वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने वाहनांच्या सुरक्षेच्यादृष्टीने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी ‘एचएसआरपी’ (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट) बंधनकारक केली. यासाठी प्रारंभी शासनाने ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत दिली होती; मात्र यासाठी नियुक्त केलेल्या फिटमेंट सेंटरची संख्या कमी आणि वाहनांची संख्या जास्त यामुळे या कालावधीत ‘एचएसआरपी’ बसवलेल्या वाहनांची संख्या कमी होती. त्यामुळे ही मुदत पुन्हा ३० एप्रिलपर्यंत वाढवली.
त्यानंतर पुन्हा दोन महिन्यांची मुदत वाढवली. फिटमेंट सेंटर संख्या वाढवून ही मुदत ३० जूनपर्यंत करण्यात आली होती; मात्र अजूनही वाहनांची संख्या पाहता मुदतवाढ देणे गरजेचे असल्याने परिवहन आयुक्तांनी आता पुन्हा चौथ्यांदा १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ केली आहे. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) बसवण्याची कार्यवाही येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू झाली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या (HSRP नसलेल्या) एकूण वाहनांची संख्या २ लाख ११ हजार ४२३ आहे. त्यापैकी आतापर्यंत HSRP बसवण्यासाठी ७० हजार वाहनांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी निम्म्या वाहनांना ही नंबरप्लेट बसवण्यात आली आहे.