खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर केलेल्या घणाघाती आरोपांवर, आम. कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे कि, महाराष्ट्रातील जनता रामदास कदम यांना चांगली ओळखून आहे, महाराष्ट्राने विशेष: कोकणाने व शिवसेनेने मला भरभरून प्रेम दिले आहे आणि त्या प्रेमाची परतफेड करणे या जन्मी तरी शक्य होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे मी कडवा शिवसैनिक आहे, त्यामुळे मी आमचेच सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बहुदा वैभव खेडेकर यांना सपान पडलं असावे असा टोला लगावला आहे. या त्यांच्या आरोपांचा मी जाहीर निषेध करतअसल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीही मी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीपूर्वीच मी कोणतेही पद घेणार नाही असे स्पष्ट जाहीर केले होते, त्यामुळे मंत्री होण्याचा किंवा नाराज होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही असे स्पष्ट आणि सडेतोड भाष्य शिवसेना नेते व आमदार रामदास कदम यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, वैभव खेडेकर हे नक्की मनसे पक्षाचे आहेत, कि राष्ट्रवादीचे पक्षाचे असा संभ्रम खेडच्या जनतेला पडला आहे. खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माझी बदनामी करणारे, तसेच माझ्या कुटुंबामध्ये गैरसमज पसरवून आपली राजकीय पोळी भाजून ठेवण्यासाठी काहीही आरोप केले असून, त्याचा मी धिक्कार करत आहे. त्यामुळे खेडेकर यांच्या बिनबुडाच्या आरोपांना मी भीक घालत नाही, आकाशाकडे बघून थुंकले कि थुंकी स्वतःच्याच तोंडावर उडते याचे भान वैभव खेडेकर यांनी ठेवावे. अखेर सत्य काय आहे ते जनतेसमोर येईलच व त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटेल असाही विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे.