रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयावर रुग्णांचा विश्वास वाढत आहे. मागील चार वर्षात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सेवेत चौपट वाढ झाली आहे. २०२१-२२ ला असणारी बाह्य रुग्ण तपासणी २०२४-२५ ला २ लाख २ हजार ६७७ वर गेली आहे. शस्त्रक्रियेमध्ये वाढ झाली आहे, डॉक्टरांची संख्याही वाढली आहे, रुग्णालयातही अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. भविष्यात एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांसाठी पोस्ट ग्रॅज्युएटही याच ठिकाणी करता यावे, म्हणून सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांचे उपकेंद्र रत्नागिरीत येत्या दोन महिन्यात सुरू होईल. त्यामुळे इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना रायगड लोणेरे येथे फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. या विद्यार्थ्यांसाठी याच ठिकाणी कॅम्पस इंटरव्हयू ही घेतले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.
उदय सामंत म्हणाले, महाविद्यालयाचे आता तीन वर्ष झाली आहेत. तिसऱ्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी शिकावू डॉक्टर म्हणूनही सेवा बजावत आहेत. त्याचप्रमाणे या सध्या २२ प्राध्यापक शिकवत असून यात सहयोगी ६ तर सहाय्यक १६ प्राध्यापकही रुग्णालयात सेवा देत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे जिल्हा रुग्णालयावर सर्वसामान्यांचा विश्वास वाढला आहे. तिसऱ्या वर्षाला असणारे १०० विद्यार्थी याच ठिकाणी इंटरर्नशिप करणार आहेत. त्याचा फायदाही रुग्णांना होणार आहे. त्याचप्रमाणे परकार हॉस्पिटलला असणारे १२ डॉक्टर याठिकाणी लेक्चरर म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालयात रत्नागिरीच्या रुग्णालयातील यंत्रसामुग्री अद्ययावत आहे. लवकरच कर्मचाऱ्यांचीही भरती केली जाणार आहे, त्यामध्ये १० क्लार्क, १०० सुरक्षा रक्षक, २०० नर्स, ४ वैद्यकीय समाजसेवक यांच्यासह अनेक जागा भरण्यात येणार आहेत.
वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी ४२९ कोटी रुपयांच्या निधीला हायपॉवर कमिटीने मान्यता दिली असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. लोटे-परशुरामचे सांडपाणी समुद्रात सोडण्यासाठी ४० कोटी लोटे-परशुराम येथून थेट समुद्रात सांडपाणी सोडण्यासाठी ४० कोटी रुपये उद्योग विभागातर्फे मंजूर करण्यात आले आहेत. गेली तीस वर्ष येथील उद्योजक असोसिएशनची मागणी होती. यासाठी आयआयटी व व्हीजेटीआयमार्फत दोन वर्ष सव्र्व्हेक्षणही करण्यात आले आहे. त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

