सतत पडणाऱ्या पावसामुळे पावस बाजारपेठ मार्गावरील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरून गेल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. अचानक वाहन खड्ड्यात गेल्यामुळे चालकांना शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वयोवृद्धांची तर मोठीच अडचण झालेली आहे. या मार्गावरून वाहने चालविणे धोकादायक ठरत असून, पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालणे धोकादायक ठरत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे. अशी मागणी निवडणुकीवेळी केली जाते. लोकप्रतिनिधीही काँक्रिटचे रस्ते बनवून देतो, असे आश्वासन देऊन निघून जातात; मात्र प्रत्यक्षात तिकडे दुर्लक्ष होते. मे महिन्यात रस्त्याची कामे न केल्यामुळे यंदाही पावसवासीयांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवात खड्यांवर मलमपट्टी करण्यात आली.
त्यानंतर सतत पडणाऱ्या पावसामुळे मलमपट्टीचा काहीच उपयोग झाला नाही. पुन्हा मोठमोठे खड्डे पाण्याने भरलेल्या अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध जैसे थे आहेत. त्या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. हे खड्डे भरा अन्यथा आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे. पावस हे पर्यटनस्थळ आहे. दिवाळी, मे महिन्यांत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. गणेशोत्सव पूर्ण झाला आहे. दसरा, दिवाळीचे वेध लागलेले आहेत, त्या सुट्यांमध्ये पर्यटक पावस परिसरात येण्यास सुरुवात होईल. त्यांनाही या खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे, पावसाळा थांबल्यावर तातडीने हे खड्डे भरावेत, अशी मागणी केली जात आहे.

