शासकीय घराचे बांधकाम रस्त्याजवळ केल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून टेरव येथे पाहणी करण्यात आली. त्याचा अहवाल बांधकाम विभागाकडून जिल्हा परिषदेला देण्यात येणार आहे. गावातील जिल्हा परिषद मालकीच्या रस्त्यांची मोजणी केल्यास टेरवमधील विविध वाड्यांतील घरे मोठ्या प्रमाणात बाधित होतील, असा अंदाज या निमित्ताने वर्तवण्यात आला आहे. टेरव येथील एकनाथ सखाराम माळी यांनी तक्रार करत दीपाली दिलीप घडशी यांनी शासकीय रस्त्यालगत विनापरवाना बांधकाम केल्याची तक्रार केली होती. त्यानुसार माळी यांनी उपोषणाचा इशाराही दिला होता. या तक्रारीवर घडशी यांनी आक्षेप घेत गावात रस्त्याच्या कडेला अनेकांनी बांधकाम केले आहे, त्यावर कारवाई कोण करणार? अशी भूमिका घेतली होती. बेकायदा विनापरवाना घरांबाबत कारवाईचे अधिकार शासनाने ग्रामपंचायतीला दिले आहेत. अशा बांधकामावर ग्रामपंचायतीला बांधकाम काढून टाकण्याचा अधिकार आहे.
त्यासाठी शासकीय रस्त्यांचे रेखांकन महत्त्वाचे होते. त्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून टेरव वेतकोंडवाडी येथील रस्त्याची पाहणी करण्यात आली. घडशी यांनी यापूर्वी घरापासून जाणाऱ्या रस्त्याला जागा दिली होती. गेल्या अनेक वर्षांपासून येथील वहिवाट आणि वाहतूक सुरू आहे. तेथे वाहतुकीला धोका नसल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. झालेल्या तक्रारीनुसार, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घडशी यांच्या घराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान बांधकामाचा काही भाग बाधित होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल अद्याप बांधकाम विभागाकडून ग्रामपंचायतीला देण्यात आलेला नाही.
६०हून अधिक घरे बाधित – टेरव येथील ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद अखत्यारितील सर्व रस्त्याचे रेखांकन केले जाणार होते; मात्र पहिल्या टप्प्यात तक्रार झालेल्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. टेरव येथील शासकीय रस्त्यांची मोजणी केल्यास ६०हून अधिक घरे बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे वेतकोंड येथील तक्रार झालेल्या घरांबाबत बांधकाम विभाग काय भूमिका घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.

