कोकणवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतीक्षित असलेली मुंबई ते कोकण रो-रो जलवाहतूक सेवा अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणार आहे. २ ऑक्टोबरला ही महत्त्वपूर्ण सेवा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांचा कोकण प्रवास अतिजलद आणि सुखकर होणार आहे. नवरात्रोत्सवानंतर सुरू होणारी ही सेवा कोकणवासीयांसाठी सरकारकडून मोठी भेट ठरणार आहे. दक्षिण आशियातील सर्वात वेगवान जलप्रवास केंद्र आणि राज्यसरकारच्या विविध परवानग्या तसेच पावसाळ्यातील हवामानाचे अडथळे यामुळे ही सेवा सुरू होण्यास विलंब झाला होता; मात्र, सागरी महामंडळाने अथक प्रयत्न करून हे सर्व अडथळे दूर केले आहेत. यामुळे आता दक्षिण आशियातील सर्वांत वेगवान जलप्रवासाचा मार्ग खुला होणार आहे.
रस्त्याच्या मार्गे मुंबई-कोकण प्रवासाला साधारणपणे १० ते १२ तास लागतात. जलमार्गाने हाच प्रवास आता अवघ्या तीन ते साडेपाच तासांत पूर्ण होणार आहे. हा महत्त्वपूर्ण बदल कोकणवासीयांचा बहुमूल्य वेळ वाचवून त्यांचा प्रवास अधिक आरामदायी करेल. रो-रो सेवेचा प्रवास मुंबईतील भाऊचा धक्का येथून सुरू होणार आहे. कोकणात ही सेवा रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड त से च सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजय दुर्ग या बंदरांपर्यंत असणार आहे. या रो-रो सेवेची प्रवासी क्षमता प्रचंड आहे. ही फेरी एकावेळी ६५० हून अधिक प्रवासी घेऊन जाऊ शकते. विशेष म्हणजे, ‘रोल-ऑन/रोल-ऑफ’ या संकल्पनेमुळे प्रवासी आपल्या कार, दुचाकी आणि सायकली देखील सोबत घेऊन जाऊ शकणार आहेत.
कोकण प्रवासासाठी ‘गेम चेंजर’ – मुंबई-गोवा महामार्गावर होणारी प्रचंड वाहतूककोंडी आणि त्यामुळे प्रवासात होणारा विलंब आता रो-रो सेवा सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे ही सेवा कोकणवासीयांच्या प्रवासासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणारी ही जलवाहतूक सेवा कोकणातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.