मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मंगळवारी घाटात टँकर उलटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली. उलटलेल्या टँकरमधून वायुगळती सुरू झाल्याने ती रोखण्याचे अथक प्रयत्न सुरू होते. त्यामध्ये जवळपास २२ तास झाले. तरीही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी सुटली नव्हती. त्यामुळे दुर्तफा वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या. प्रवाशांचे, रुग्णांचे मोठे हाल झाले. खायचे प्यायचे वांदे झाले होते. २२ तासांनंतर मुंबईहून आलेल्या मदतपथकाने वायुगळती थांबविली आणि दुपारी ३ वा.च्या सुमारास वाहतूक अंशतः सुरू झाली. तरी सायंकाळी उशीरापर्यंत दुर्तफा लागलेल्या वाहनांच्या रांगा कमी होत नव्हत्या. मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक २२ तास ठप्प होती. या वाहतुक कोंडीम ळे अनेक प्रवासी बेहाल झाले आहेत. वाहतुक कोंडीमुळे काही प्रवाशांना व्यवसायाच्या बैठकीसाठी जायचे होते. मात्र कोंडीमुळे त्यांना इच्छित स्थळी पोहचता आले नाही. काही प्रवासी वाहने मुंबईच्या दिशेने येत आहेत त्यांनाही कोंडीचा सामना करावा लागत आहे.
सकाळी ७ वाजता एक टेम्पो चालक या कोंडीत फसला. त्याने प्रशासनावर आरोप करत कुणीही वाहतूक कोंडीची पूर्वकल्पना दिली नसल्याचा आरोप केला. खंडाळा घाटातील बोगद्याजवळ हा गॅस टँकर पलटी झाला. त्यातून होणाऱ्या गॅस गळतीमुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रवासी, रुग्ण अडकले या वाहतूक कोंडीत लातूरहून मुंबईच्या दिशेने एक प्रवासी अडकले आहे. हे प्रवासी एका कॅन्सरग्रस्त रुग्णाला घेऊन मुंबईच्या टाटा रुग्णालयात उपचारासाठी येत होते. सकाळी ८ वाजता त्यांना रुग्णालयात पोहचायचे या हेतूने रात्री १० वाजता ते लातूरहून निघाले. मात्र ४ वाजल्यापासून ते वाहतूक कोंडीत अडकले आहेत. दुसरे प्रवासी रात्री ३ वाजल्यापासून या वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यांचा विमान प्रवास होता मात्र या कोंडीमुळे त्यांचा विमान प्रवास रद्द करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने एका बाजूची वाहतूक सुरू ठेवायला हवी होती असं संतप्त प्रवासी म्हणत होते. मात्र २०-२२ तासांपासून वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे आता खायचे-प्यायचे हाल झाले आहेत.
दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. तेव्हापासून पहाटे ४ वाजेपर्यंत टँकरमधील गॅस गळती थांबवण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर सकाळी पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू झाले. मात्र या प्रयत्नाला यश कधी मिळेल हे सांगणे कठीण आहे. ज्या यंत्रणा आहेत त्यांनाही कोंडीमुळे घटनास्थळी पोहचणे कठीण होत आहे. एनडीआरएफ टीम इथे पोहचलीय, टाटाची टीम आहे. केमि कल तज्ज्ञ इथे पोहचले अशी माहिती हेल्प फाऊंडेशन रेस्क्यू टीमचे गुरुनाथ साठेलकर यांनी माध्यमांना दिली. गॅस टँकर पलटल्याने त्यातून गॅस लिकेजचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद केली होतो. पुण्याकडे जाणारी वाहतूकही खालापूर टोलनाक्यापर्यंत कोंडी झाली. त्यामुळे गॅस लिकेजचे प्रमाण कमी होऊन ते पूर्णपणे संपेपर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

