नको शेलू नको वांगणी गिरणी कामगारांना घर मुंबईतच हवे उद्योगपतींना मुंबईतील जागा देत असाल तर गिरणी कामगारांबाबत सरकार सुडाचे राजकारण का करीत आहे? असा संतप्त सवाल राष्ट्रीय मिल मजदूर संघ सरचिटणीस तथा कामगार नेते गोविंदराव मोहिते यांनी गुरुवारी चिपळूण शहरातील आंबेडकर सभागृह येथे मिल मजदूर संघाच्या कामगार सभेला मार्गदर्शन करताना सरकारला केला. दि. १० मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा काढून आझाद मैदान मुबई येथे होणाऱ्या आंदोलनाला गिरणी कामगार आणि वारसदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्यावतीने आयोजित या सभेला व्यासपीठावर सरचिटणीस गोविंदराव मोहिते, कामगार नेते सुरेशराव मोरे, सचिन निगडे, तुकाराम साळवी, शंकर शिंदे रवींद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईतील गिरणी कामगार व त्यांच्या वारस कुटुंबियांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचा निर्धार गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे निमंत्रक व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी यावेळी म ार्गदर्शन करताना व्यक्त केला. येत्या १० मार्च रोजी स ११ वा. आझाद मैदान मुंबई येथे लाखो गिरणी कामगार व त्यांच्या वारस कुटुंबियांच्या उपस्थितीत विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी चिपळूण मधील सभेत केले.
गुरुवारी जिल्ह्यातील गिरणी कामगार वारस व कुटुंबीयांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला असंख्य वारस व कुटुंबे उपस्थित होते त्यांना मार्गदर्शन करताना मोहिते म्हणाले की गेली २० वर्षे गिरणी कामगारांच्या घरांसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे मात्र शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे आता निर्णायक आंदोलन उभारण्याची वेळ आली असून १० मार्च रोजी होणारे आंदोलन हे त्याचाच एक भाग आहे. मुंबईतील उपलब्ध गिरणी जागांवर घरकुल उभारून कामगारांना न्याय द्यावा ही गिरणी कामगार संयुक्त लढा समितीची मागणी असून १० मार्चच्या मोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी होऊन हक्काचा लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन कामगार नेते सुरेशराव मोरे यांनी यावेळी केले.

