मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे तीन दिवसांपूर्वी शस्त्रधारी माणसे गटामध्ये दिसली असल्याची बातमी पोलिसांना मिळाल्यापासून, त्याबाबतचे सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. सावित्री खाडी पात्रातील सशस्त्र अतिरेकी दिसल्याच्या वृत्तावरुन पोलिसांचा गेले तीन दिवस सुरू असलेल्या सर्च अजून सुरु आहे.
पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना मंडणगडात थांबण्याचे आदेश दिले आहे. रत्नागिरी, रायगडमधील शोध पूर्ण होईपर्यंत सर्च ऑपरेशन सुरूच राहणार असल्याच्या वृत्ताला राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळाला आहे.
रविवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा हायअलर्ट वर असून मंडणगडमध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. स्वत: पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी, त्यांची विविध पथके मंडणगड परिसरात मुक्काम ठोकून आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी रत्नागिरी, रायगडमधील छोट्यामोठ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
मंडणगड तालुक्यातील प्रत्येक चेक नाक्यांसह सागरी सीमांवरही विशेष लक्ष केंद्रित करून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जर खाडी परिसरामध्ये असे शस्त्रधारी अतिरेकी दिसले, तर मग ते गेले कुठे! असा सवाल जनतेला पडला आहे. गेले तीन दिवस शोध मोहीम सुरुच आहे.
या प्रकरणातील सर्व शक्यता पोलिस पडताळून पाहत त्यावर अभ्यास करताना दिसून येत आहेत. यापूर्वी देखील सन १९९३ साली मुंबईमध्ये घडवून आणलेल्या दहशतवादी कारवायांसाठी कोकण किनारपट्टीचा वापर केला गेला होता. दहशतवादी समुद्रमार्गेच मुंबईवरील दहशतवादी हल्लासाठी मुंबईत दाखल झाले होते. किनारपट्टीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होत असल्याचा इतिहास असल्याने आता सर्व शक्यता पडताळल्या जाणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.