राज्यातील रस्ते आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये अनेक अपुरे राहिलेले महामार्ग आणि त्यांच्या नियोजनाबद्दल चर्चा मसलत करण्यात आली. त्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या थांबलेल्या कामाबाबत सुद्धा चर्चा झाली.
मुंबई गोवा महामार्गाचं काम मागील २ वर्षे तरी कासवाच्या चालीच्या गतीने सुरु असून, सध्या ते रखडल्यातच जमा असल्याने, अशा कंत्राटदाराला बरखास्त करण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. या एमईपी कंत्राटदाराला बरखास्त करून, त्या जागी दोन नवे कंत्राटदार नेमण्यात येणार असल्याचे, नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं.
मुंबई-गोवा महामार्गावर कोकणातील रस्त्यांची अतिवृष्टीमुळे होणारी भीषण स्थिती पाहता, हे रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनविण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
खासदार विनायक राऊत यांनी, मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते लांजापर्यंतचे ९२ किमी पॅकजचे काम असलेल्या एमईपी कंत्राटदाराला बरखास्त करुन दोन नविन कंत्राटदार नेमण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती दिली. येत्या १५ दिवसामध्ये यावर कार्यवाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले कि, राज्यात सध्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची जे प्रकल्प धीम्या गतीने सुरू आहेत त्यांना गती देण्यासाठी मंत्रालय स्तरावर मुख्य सचिव या प्रकल्पांचा नियमित आढावा घेणार असून त्यानंतर आपण स्वतः आणि उपमुख्यमंत्र्यांसह दरमहा या प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकारकडे रस्ते प्रकल्पांशी संबंधित प्रलंबित असलेल्या बाबींवर तत्काळ निर्णय घेऊन महामार्गांची कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकार्यांना दिल्या आहेत.