मागील सतत दोन तीन वर्ष विविध माध्यमाच्या द्वारे रस्त्याची झालेली दुरावस्था आणि त्यामुळे ग्रामस्थांचे होणारे हाल लक्षात घेता, याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. सिंधुदुर्ग विमानतळ उदघाटन होण्यापूर्वी रस्ता सुस्थितीत केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थानी दिल्यावर मशीनरी आणून रस्ता काम सुरु करण्यात आले होते, परंतु विमानतळाचे उदघाटन झाल्यावर लगेच दोन दिवसांनी कामं थांबवून कॉन्टॅक्टर निघून गेला. याबाबत विचारणा केली असता अजून वर्कऑर्डर मिळाली नसल्याचे उत्तर देण्यात आले.
लोकांना चांगल्या रस्ता बनविण्याचे गजर दाखवून निव्वळ दिशाभूल करून उदघाटन आटोपण्यात आल्याची चर्चा होती. मात्र आज पिंगुळी पाट मार्गावरून पालकमंत्री उदय सामंत जाणार असल्याची खबर मिळाल्यावर ग्रामस्थांनी आंदुर्ले खिंड येथून जाणारा पालकमंत्र्यांच्या गाडीचा ताफा अडवून घेराव घातला आणि रस्त्याच्या दुरावस्थेबाबत विचारणा केली. तसेच प्रशासनाकडून देण्यात आलेली आश्वासने आणि केली जाणारी दिरंगाई सुद्धा निदर्शनास आणून दिली. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या संतप्त भावना नाम. सामंतांसमोर व्यक्त केल्या.
यावर पालकमंत्री सामंत यांनी संबंधित ठेकेदार आणि पीडब्लूचे अधिकारी यांच्याशी ताबडतोब संपर्क साधून कानउघडणी केली. रस्त्याचे काम १० ते १५ दिवसात न झाल्यास संबंधित ठेकेदारास ब्लॉकलिस्टमध्ये टाकले जाईल, असेही सांगितले. त्यामुळे येत्या १० दिवसात रस्त्याचे BBM आणि पुढील १५ दिवसात कार्पेट पूर्ण होईल, अशी ग्वाही सर्व उपस्थितीत सर्व पक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांना त्यांनी दिली.
संतप्त ग्रामस्थानी एका महिन्यात काम पूर्ण न झाल्यास इथेच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी कुडाळ माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, महेश पाटकर, दत्ता पाटकर, संजय सर्वेकर, अमित गावडे, पाट माजी सरपंच सौ. कीर्ती ठाकूर, नागेश आरोलकर, अनिल भगत, निलेश मुणगेकर, विनायक नांदोस्कर, श्यामसुंदर राऊळ, संतोष गोडे , प्रसाद सर्वेकर, गणेश राऊळ, तेंडोली सरपंच मंगेश प्रभू , म्हापण माजी सरपंच नाथा मडवळ, आंदुर्ले माजी सरपंच सौ. आरती पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर तांडेल, श्री. रत्नाकर प्रभू, जगदीश म्हापणकर, अक्षय तेंडोलकर, मिलिंद निर्गुण, विशाल राणे, माड्याचीवाडी माजी सरपंच दाजी गोलम, हुमरमाळा येथील शेखर परब, श्रीधर मराळ, प्रेमानंद सावंत आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.