राज्यामध्ये दहावी, आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १० वीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहेत. तर बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती दिली आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्याच प्रमाणे मागील दीड वर्ष शाळा ऑनलाईन असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याकडून परीक्षेची पुरेपूर तयारी, लिखाणाचा वेग, वेळ लावून पेपर सोडवण्याचा सराव, कोरोनामुळे लिखाणाचा स्पीड कमी झालेला असल्याने, विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या लिखाणाला पुरेसा वेळ मिळावा आणि काही प्रमाणात पेपर सोडवायचा राहिला तरी त्याचे दडपण विद्यार्थी घेऊ नये यासाठी ठराविक गुणांसाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षांच्या वेळी सुद्धा शिक्षण मंडळाने वाढीव वेळेची घोषणा केली होती, मात्र कोरोनाच्या अति प्रमाणात वाढलेल्या प्रादुर्भावामुळे लेखी परीक्षाच न झाल्याने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. यंदाच्या वर्षी मात्र विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पूर्ण सोडविण्यासाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि नक्कीच हि बातमी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये यंदा प्रथमच ८० गुणांच्या पेपरसाठी तब्बल अर्धा तास तर ४० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटांचा वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सकाळी ११ वाजता सुरू होणारा पेपर यंदा सकाळी १०.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर दुपार सत्रातील परीक्षेची सुरुवात दुपारी ३ वाजता होणार आहे.