राज्यात नव्या व्हेरीयंटचे रुग्ण वाढत असलेले दिसून येत असल्याने, जिल्हा स्तरावर सुद्धा अनेक निर्बंध कडक करण्यात आले आहेत. शासनाने ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला दि. २४ डिसेंबर २०२१ च्या आदेशास अनुसरुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. २५ डिसेंबर आदेश लागू करण्यात आले आहेत. परंतु आता राज्यामध्ये कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनमुळे अधिक धोका निर्माण झाला आहे. या कारणास्तव शासनाने दि. २४ डिसेंबर २१ च्या आदेशामध्ये अंशत: बदल करुन सुधारीत निर्बंध लावण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी रत्नागिरी डॉ. बी. एन.पाटील हे साथरोग अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कोव्हीड-१९ विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडील २४ डिसेंबर २१ च्या आदेशाला अनुसरुन रत्नागिरी जिल्हयात खालीलप्रमाणे अतिरिक्त कडक निर्बध लागू करण्यात येत आहेत.
१. विवाह समारंभ बंद जागेमध्ये किंवा मोकळया जागेमध्ये आयोजित करते वेळी उपस्थितांची कमाल संख्या हि केवळ ५० व्यक्तीं पुरतीच मर्यादित राहील याची काळजी घ्यावी.
२. कोणताही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक मेळावा किंवा कार्यक्रम बंद जागेमध्ये किंवा मोकळया जागेमध्ये आयोजित करतेवेळी उपस्थितांची कमाल संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित राहील.
३. दुखद प्रसंगी, अंतिम संस्कारासाठी उपस्थितांची कमाल संख्या २० व्यक्तीं पुरती मर्यादित असणार आहे.
४. या आदेशात नमूद केलेल्या निर्बंधा व्यतिरिक्त यापूर्वी कोरोना विषाणू संदर्भातील सर्व सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले कोरोना निर्बंध आदेश / मार्गदर्शक सूचना व निर्बंध पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील. हा आदेश संपूर्ण रत्नागिरी जिल्हयाच्या क्षेत्रासाठी लागू राहील (प्रतिबंधित क्षेत्र वगळून), असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे .