कोकणाला विविध फळ झाडांच्या उत्पन्नाची निसर्गतःच देणगी लाभली आहे. त्यामुळे त्यांचा वापर करून एखादा व्यवसायभिमुख उद्योग सुरु करण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षे होत आहे. जेणे करून स्थानिक फळांना सुद्धा भाव येईल आणि स्थानिकाना सुद्धा रोजगार प्राप्त होईल. त्यामुळे मागणी मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी कोकणातील काजूसह, जांभुळ, आंबा व करवंदापासून वाईन निर्मितीला परवानगी द्या अशी मागणी केली आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. परंतु, हा निर्णय कोकणावर अन्याय करणारा आहे. कोकणातील काजूसह, जांभुळ, आंबा व करवंदापासून वाईन निर्मितीला परवानगी देण्याची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्री व उत्पादनशुल्क मंत्र्यांना पत्र पाठवून कोकणातील बागायतदारांबात योग्य निर्णय घेण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली आहे.
आतापर्यंतच्या सर्वच राज्य सरकारांनी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राकडे लक्ष देत कोकणवर अन्याय केला आहे. आताचे आघाडी ठाकरे सरकारही तेच करत आहे. कारण या सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. कोकणातील काजूपासून वाईन निर्मिती करण्यासाठी कृषी विद्यापीठासहीत अनेक संशोधकांचा फॉर्म्युला तयार आहे. परंतु, अद्याप त्याला परवानगी देण्यात आलेली नाही. कोकणातील काजूसोबतच जांभुळ, करवंद व आंब्यापासून वाईन निर्मितीबाबत संशोधन झाले आहे; मात्र, द्राक्षापासून वाईन निर्मितीचा सरकारचा मनसुबा असल्याने नाशिक व इतर भागात अशा वायनरीला प्रोत्साहन दिले जात आहे.
कोकणामध्ये मात्र वाया जाणाऱ्या या उत्पदनांबाबत साफ दुर्लक्ष केले जात आहे. हा कोकणवासीयांवर एक प्रकारचा अन्याय आहे. कोकणात कॅनिंगला जाणाऱ्या आंब्यासाठी तसेच इतर उत्पादनांसाठी वायनरी झाल्यास त्याचा नक्कीच बागायतदारांना फायदा होणार आहे. मात्र, राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी सर्वच मंडळी या साऱ्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष करत आहेत.