राजापूर तालुक्यातील केळवडे येथील दिपक उर्फ बाबू गुरव हे शुक्रवारी सकाळी जंगलात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याला बंदुकीच्या गोळ्या लागल्यानेच ते गंभीर जखमी झाल्याची चर्चा गावामध्ये सुरू आहे. त्यांना जंगलमय परिसरातून असे रक्ताने माखलेल्या अवस्थेत पहिल्याने, एकच खळबळ माजली आहे. नक्की काय घडले हे कळले नसून, यात घातपाताची शक्यता नाकारता येत नाही आहे, याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस तपास सुरू होता.
मिळालेल्या माहितीनुसार केळवडे येथील दीपक राजाराम गुरव हे शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे गुरे घेऊन बागेत चरायला सोडण्यासाठी गेलेले. त्यानंतर काही वेळाने शेतात कामासाठी जाणाऱ्या महिलांना ते जंगलामध्ये रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी राजापूर येथील एका खासगी रूग्णालयात त्वरित दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या डोक्याला बंदुकीच्या गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाल्याने गावात वेगळीच चर्चा सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी राजापूर पोलिसांना संपर्क साधत या घटनेबाबत माहिती दिली.
राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर अतिरिक्त तपासासाठी आपल्या टिमसह केळवडे गावात दाखल झाले असून, सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस तपास सुरू होता. त्यामुळे या घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. परंतु राजापूर तालुक्यात घडलेल्या या घटनेने मात्र जिल्हा हादरून गेला आहे. जंगलमय भागात ते असे रक्ताळलेल्या जखमी अवस्थेत सापडल्याने अनेक तर्कवितर्काना उधाण आले आहे.
शनिवारी 5 रोजी सिंधुदुर्गातून रत्नागिरीत उपचारासाठी हलविण्यात येत असताना गुरव यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय तपासणीदरम्यान गुरव यांच्या डोक्यात बंदुकीचे छरे आढळून आल्याने त्याचा घातपाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली आहे.