रत्नागिरी तालुक्यातील अनेक पुलाची डागडुजी करणे आवश्यक आहे. तोणदे-हातिस पुलासाठी सुरु असलेल्या कामासंदर्भात किंवा जागेसंदर्भात तोणदे ग्रामस्थांना विचारात न घेता तसेच त्यांना न कळविता असलेल्या कामासंदर्भात तोणदे ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री. राजन सुर्वे यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत संबंधीत कार्यालयाला भेट दिली.
तोणदे-हातिस पुलासाठी सद्यस्थीतीत ज्या जागेत कामकाज चालू आहे ते तात्काळ थांबवावे आणि यापुर्वी सा.बां. विभागाला सुचविलेल्या तोणदे जेटी ते जेटी आणि तोणदे ग्रामपंचायत ते हातिस अशा दोन जागेपैकी एक जागा निवडून त्यामध्ये तोणदे-हातिस पुलाचे बांधकाम करावे असा अर्ज संबंधित विभागाला ग्रामस्थांमार्फत देण्यात आला असुन श्री. राजनजी सुर्वे यांनी संबंधीत अधिकारी यांना चौकशी करुन कार्यवाही करावी असे सांगितले.
तोणदे-हातीस पुल व्हावा यासाठी तोणदे ग्रामस्थांची २०१३ पासूनची मागणी आहे तसेच हातीसच्या उरुसाला दरवर्षी सुमारे २० ते २५००० भाविक तोणदेतून होडीने प्रवास करीत आहेत आणि त्या दरम्यान पुन्हा काही दुर्घटना घडू नयेत हे लक्षात घेऊन तोणदे-हातीस पुल होणेसाठी मागणी झाली असल्याचे श्री. संजय पुसाळकर यांनी सांगितले.
रत्नागिरी तालुक्यातील तोणदे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी तोणदे हातीस पूलासाठी तोणदे जेटी ते तोणदे ग्रामपंचायत, हातिस अशा दोन जागा ग्रामस्थांकडून सुचवील्या असताना त्याच्या व्यतिरिक्त अन्य जागी काम सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे असे श्री. अल्ली काझी यांनी सांगितले. तोणदे हातिस पुलासाठी ग्रामपंचायतीची परवानगीसुध्दा घेतलेली नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य श्री. राकेश सुर्वे आणि श्री. सचिन जाधव यांनी सांगितले.
तसेच तोणदे – हातिस पुलासाठी सद्यस्थीतीतील जागेवरून भाविकांसह गावातील ग्रामस्थांना जाण्या-येण्यासाठी अंतर वाढणार असल्याने तोणदे ग्रामस्थांना तसेच इतर गावांना नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याचे श्री. सूहास सुर्वे आणि श्री. सतीश पुसाळकर यांनी सांगितले. तोणदे-हातिस पुलासाठी सद्यस्थीतीत ज्या जागेत कामकाज चालू आहे ते तात्काळ थांबवावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.