रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात साधारण दोन वर्षापूर्वी एका ठेकेदार कंपनीकडून कामगारांची फसवणूक करण्यात आली होती. तब्बल ४० कामगारांच्या कष्टाचे १२ लाख ५० हजार रुपयांचे वेतन घेवून तीन परप्रांतीय ठेकेदार पसार झाल्याची घटना शहरालगतच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपर मिलमध्ये दोन वर्षापूर्वी घडली होती. कामगार सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने कंपनीकडे न्याय मिळवून देण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी तगादा लावला होता.
अखेर कंपनी चालकांनी कर्मचाऱ्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करून त्या तीन परप्रांतीय ठेकेदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस हर तर्हेने त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करत होते, परंतु, वारंवार ते फोनचे लोकेशन बदलत असल्याने नक्की त्यांचा ठावठिकाणा सापडत नव्हता.
अखेर पोलिसांना ते गुजरात मध्ये असल्याची पक्की खबर मिळाली आणि त्यांच्या अखेर अथक प्रयत्नानंतर या तिघांनाही बेड्या ठोकण्यात चिपळूण पोलिसांना यश आले आहे. तिघांनाही गुजरात येथे सापळा रचून ताब्यात घेत अटक केली असून पोलिसांच्या या कामगिरीचे विशेष कौतूक केले जात आहे. दुसर्या राज्यात जाऊन सुद्धा चिपळूण पोलिसांनी या लबाड ठेकेदारांना पकडून आणण्यात यश मिळवले.
सौरभ यादव, रविसिंग यादव, पंकजकुमार यादव सर्व रा. ईटावा उत्तरप्रदेश अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. यातील सौरभ व रविसिंग हे भाऊ आहेत. या तिघांकडे थ्री एम पेपर मिलला कामगार पुरवण्याचा ठेका होता. त्यानुसार त्यांनी ४० कामगार पुरवले होते. मात्र तीन महिन्यांचे वेतन न देताच सप्टेंबर २०२० मध्ये या तिघांनीही मोठ्या रकमेसह पोबारा केला होता. आता पोलिसांच्या हातात मिळाल्याने, अनेक कृत्य उघडकीस येण्याचे संकेत मिळत आहेत.